जालना – शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी शुक्रवारी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने धाड टाकली. खोतकरांच्या जालन्यातील निवासस्थानी आज सकाळी साडेआठच्या सुमारास ईडीने ही कारवाई केली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खोतकरांनी लना येथील साखर कारखाना विक्रीत १०० कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप लगावला होता. सोमय्यांच्या या आरोपानंतर आता ईडीने कारवाईचा बडगा उगारला आहे.
शिवसेना नेते खोतकर हे जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असल्याने जालन्यातील बाजार समितीतही ईडीची तपासणी सुरु आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून ईडीचं पथक खोतकरांच्या भाग्यनगर येथील बंगल्यामध्ये तपासणी करत आहे. या पथकात १२ जणांचा समावेश आहे. खोतकरांच्या बंगल्याचे दरवाजे आतमधून बंद केले असून कोणालाही आतमध्ये प्रवेश देण्यात येत नसल्याचं कळतंय.
तत्पूर्वी, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी, औरंगाबादेतील उद्योजकांच्या माध्यमातून रामनगर सहकारी साखर कारखान्यामध्ये खोतकरांचे अर्थिक संबंध असल्याची तक्रार केली होती. खोतकर यांनी सोमय्यांचे हे आरोप फेटाळून लावले होते. या अआरोपणा उत्तर देताना त्यांनी, ‘आपले काही लाखांचे शेअर्स कारखान्यात आहेत. आपण भागीदार आहोत. मालक नाही,’ असं स्पष्ट केलं होत.
भाजप नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. अनिल देशमुखांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यानंतर सोमय्या यांनी थेट देशमुखानंतर अनिल परब यांचा नंबर असल्याचा दावा केला होता. अनिल परब यांची देखील सध्या चौकशी सुरु आहे.
भाजपकडून यंत्रणांचा गैरवापर
दरम्यान, राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीला अस्थिर करण्यासाठी भाजप केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करत असून केंद्रीय यंत्रणांमार्फत होणाऱ्या कारवाया राजकीय आकसापोटी असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला आहे.