पुणे – महावितरणने गुरुवारी रात्री 10 ते शुक्रवारी पहाटे 3 या काळात काही भागांत अचानक टप्प्याटप्प्याने भारनियमन केले. याचा फटका शुक्रवारी पाणीपुरवठ्याला बसला. चतृ:शृंगी केंद्राअंतर्गत पाषाण, बाणेर तसेच पाषाण-बाणेर लिंक, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी तसेच औंधच्या काही भागांत पाणीच आले नाही.
आधीच गुरुवारी पाणी बंद आणि त्यानंतर शुक्रवारी पाणीच न आल्याने नागरिकांना मनस्ताप झाला. दरम्यान, महापालिकेने सायंकाळी काही वेळ या भागांत पाणी पुरवठा केला. कोथरूडमधील सुतारदरा परिसराचा पाणी पुरवठाही विस्कळीत झाला होता. त्यामुळे टॅंकरद्वारे पाणी द्यावे लागले. अतिउच्चदाब 400 केव्हीच्या शिक्रापूर ते तळेगावच्या चार पैकी दोन वीज वाहिन्यांमध्ये गुरूवारी रात्री बिघाड झाला.
परिणामी, चाकण एमआयडीसीसह पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांत वीज पुरवठा खंडीत झाला. गुरुवारी रात्री कोथरूड, एसएनडीटी, औंध, बाणेर, शिवाजीनगर, बालेवाडी, बावधन, मॉडेल कॉलनी, पाषाण आदी भागांमध्ये एक तासांचे चक्राकार पद्धतीने भारनियमन करण्यात आले. पण, याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला.
पेठांमध्ये कमी दाबाने पाणी
पेठांमधील पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. मध्यवर्ती पेठांमध्ये साडेपाच ते सकाळी दहा वाजेपर्यंत पाणी देण्यात येते. मात्र, बुधवारीही एक ते दीड तास देण्यात आले. त्यानंतर गुरुवारी पाणीच बंद होते. तर, शुक्रवारी सकाळीही अनेक भागांत अवघे एक ते दोन तास पाणी आले. त्यालाही दाब नव्हता. त्यामुळे नागरिकांना अतिशय कमी पाणी मिळाले असल्याने नागरिकांची पाणीकोंडी झाली आहे.
“आधीच गुरुवारी पाणी बंद होते. त्यानंतर वीज पुरवठ्याचे कारण देत शुक्रवारी सकाळीही पाणी देण्यात आले नाही. नागरिकांना दोन दोन दिवस पाणी मिळत नसल्याने खासगी टॅंकरचा आधार घ्यावा लागत आहे. महापालिकेने सर्व बाबींचा विचार करून आधीच नियोजन करणे गरजेचे आहे,” माजी नगरसेवक सनी निम्हण म्हणाले.