भोर – भोर तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे 1 हजार 364 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. 5 हजार 484 शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भोर पंचायत समितीचे उपसभापती श्रीधर किंद्रे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
भोर तालुक्यात 25 ओक्टॉबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या परतीच्या पावसाने फळ पिके सोडून जिरायती पिके कापणीला आलेली भाताचे पीक भाजीपाला, भुईमूग, नाचणी,सोयाबीन या प्रमुख पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. तालुक्यात सुमारे 92 लाख 80 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे प्राथमिक पाहणीत आढळून आले आहे. याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे.
भोर तालुक्यात पावसामुळे ऑगस्ट ते सप्टेंबर या दोन महिन्यामध्ये दोनवेळा शेतीतील पिके वाहून गेली. तर शेतामध्ये तालिनची पडझड झाली. दोन्हीवेळी नुकसानभरपाई मिळण्यासाठी शेतकाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले. व शेतीचे पंचनामे झाले;परंतु या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना अद्यापही मिळाली नाही. तेव्हा ती भरपाई सुद्धा मिळावी अशी मागणी किंद्रे यांनी केली आहे.