मुंबई – कारकिर्दीत सलग दुसऱ्या वेळी अर्जुन पुरस्काराच्या शिफारशीला मुकलेल्या बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयने देशातील दृष्टिकोनावर व संघटनेवर टीका केली होती. त्यावर नेटकरी सक्रिय झाले व त्यांनी प्रणॉयलाच ट्रोल केले आहे. तू देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खेळतोस की पुरस्कारांसाठी, असा सवाल नेटकऱ्यांनी त्याला विचारला आहे.
भारतीय बॅडमिंटन संघटनेवर त्याने अत्यंत गैरपद्धतीने टीका केली होती. माझी कामगिरी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सरस होत असूनही मला पुन्हा एकदा डावलण्यात आले. नवोदित असलेल्या सात्विक साईराज, चिराग शेट्टी व समीर वर्मा यांची शिफारस संघटना करते. मात्र, माझ्या कामगिरीकडे कानाडोळा करते यामुळे खूप निराश झालो आहे. संघटनेचा निर्णय एक मोठा विनोद आहे. देशातील क्रीडा संघटनांकडे दृष्टिकोन नसल्यानेच अशा गोष्टी घडतात, अशी टीका प्रणॉयने केली होती. त्यावर सोशल मीडियावर अनेकांनी प्रणॉयबाबत सहानभूती व्यक्त केली. मात्र, त्याचबरोबर त्याच्या वक्तव्यांवर टीकाही केली आहे.
खेळाडूने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करावे. केवळ काही लाभ होतील यासाठी खेळू नये. खरेतर ज्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते त्यांची दखल घेतली गेली पाहिजे हे खरे आहे. मात्र, केवळ पुरस्कारांसाठी खेळ करू नये. सध्या अनेक खेळाडूंना असे वाटते की त्यांना सर्वोच्च पुरस्कार मिळावेत पण केवळ पुरस्कार मिळाले म्हणजेच सर्वकाही मिळाले असे समजू नये. कोणत्याही क्रीडा क्षेत्रात अव्वल कामगिरी करणारे खेळाडू देशात कमी नाहीत. प्रत्येकाने जर पुरस्काराची अपेक्षा केली आणि असे पुरस्कार मिळाले नाहीत तर तेदेखील नाराज होतील. मग सगळ्यांनीच टीका सुरू करायची का, असा सवालही प्रणॉयला विचारला आहे.
संघटनेच्या शिफारशींवर आश्चर्य….
राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेत पदके जिंकलेल्या खेळाडूंचा विचार प्राधान्याने का केला जात नाही. सात्विक व चिराग यांनी अशी कोणती कामगिरी केली की त्यासाठी त्यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली. एकवेळ ते आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले आहेत. मात्र, समीर वर्माची काय कामगिरी आहे. 2018 साली त्याने पदके जिंकली. मात्र, गेल्या दोन मोसमात त्याला अपयशच आले आहे. तरीही त्याची शिफारस केली जाते व मला डावलले जाते याचे आश्चर्य वाटते, असे मत प्रणॉयने व्यक्त केले आहे.