मुंबई – राज्यात दरड कोसळण्याचे प्रकार वाढले आहेत. यासाठी तज्ज्ञांची समिती नेमून भूगर्भात किंवा वातावरणात काही बदल होत आहेत का? याचा अभ्यास केला जाणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत याची चर्चा झाल्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संमतीनंतर तज्ज्ञांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
तसेच राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार पूरग्रस्तांसाठी तातडीने मदतीचे वाटप सुरु केले आहे. प्रशासनाला निधी काढण्याची परवानगी दिली आहे. आजही काही भागात पाणी भरलेले असल्यामुळे पंचनामे करण्यात अडचण येत आहे. जिथे पाणी ओसरले आहे, तिथे पंचनामे सुरु आहेत. कुणीही मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही देखील यावेळी त्यांनी दिली.
प्रशासन आपल्यापरीने मदत आणि पुनर्वसनाचे काम करत आहे. अशावेळी पूरग्रस्त भागात राजकीय नेत्यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान प्रशासकीय अधिकारी उपस्थित असायलाच हवा, अशी अपेक्षा ठेवू नये. तसेच हवामान खात्याकडून येत्या काही दिवसात पुन्हा मोठा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार राज्य शासनाने महाराष्ट्रात अलर्ट जारी केला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.