55 वर्षांपुढील कर्मचाऱ्यांच्या जाणीवपूर्वक बदल्या
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या 55 वर्षांपुढील सुरक्षारक्षकांच्या बदल्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात करण्यात आल्यामुळे या सुरक्षारक्षकांमधून संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे आयुक्तांनी याबाबत स्पष्ट आदेश दिले असून, 55 वर्षांपुढील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत, असे म्हटले आहे. त्यानंतरही केलेल्या या बदल्यांमुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर 55 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलावू नये, असे आदेश आहेत. असे असतानाही महापालिकेत 55 वर्षांपुढील सुरक्षारक्षक काम करत आहेत. महापालिकेच्या विविध विभागांत कार्यरत असलेले हे सुरक्षा कर्मचारी करोनाच्या महामारीमध्येही कामावर आहेत. मात्र, 26 मे रोजी सुरक्षा विभागाच्या सहायक आयुक्तांनी आदेश काढत वायसीएममधील दहा सुरक्षारक्षाकांच्या महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये बदल्या केल्या आहेत. तर येथील दहा जणांना वायसीएममध्ये रुजू होण्यास सांगितले आहे.
या बदल्या करताना जाणीवपूर्वक 55 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या पाच ते सहा जणांचा समावेश करत त्यांना वायसीएममध्ये पाठविण्यात आले आहे. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये पन्नास वर्षांपेक्षा कमी वय असलेले अनेकजण असतानाही 55 वर्षांपुढील व्यक्तींच्या बदल्या करण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या व्यक्तींना करोनाचा सर्वाधिक धोका असतानाही बदल्या केल्यामुळे सुरक्षारक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे.
कर्मचारी महासंघही सुरक्षारक्षकांच्या पाठीशी
55 वर्षांपुढील व्यक्तींना करोनाचा सर्वाधिक धोका आहे. वायसीएम हे करोना रुग्णांसाठी राखीव रुग्णालय असल्यामुळे त्या ठिकाणी 55 वर्षांपुढील सुरक्षारक्षकांना पाठवू नये, अशी भूमिका महापालिका कर्मचारी महासंघाने घेतली आहे. याबाबत सुरक्षारक्षकांच्या प्रमुखांशी बोलणे झाले असून बदली करू नये, अशी विनंती करण्यात आल्याची माहिती महासंघाचे खजिनदार अविनाश ढमाले यांनी “प्रभात’शी बोलताना दिली.