कपूर घराण्याची लेक रीमा जैन यांचा मुलगा अरमानच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. ईडीने त्याला टॉप्स ग्रुपशीसंबंधित 175 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दुस-यांदा समन्स बजावले आहे. अरमानला यापूर्वीही चौकशीसाठी बोलवण्यात आले होते, मात्र तो हजर झाला नव्हता. अरमान हा राज कपूर यांच्या मुलीचा मुलगा आहे. तो बॉलिवूड सेलिब्रिटी रणबीर कपूरचा आत्येभाऊ आहे. त्यामुळेच त्याला चौकशीसाठी समन्स बजावल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ज्यादिवशी ईडीने अरमानच्या घरावर छापा टाकला होता, त्याचदिवशी त्याचे मामा राजीव कपूर यांच्या निधनाचे वृत्त आले होते.
अरमान जैनच्या घरीही तपास यंत्रणेने छापा टाकला होता. या घरात तो पत्नी अनिषा मल्होत्रा, आई रीमा जैन आणि इतर सदस्यांसह राहतो. या प्रकरणात त्याचे नाव शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग याच्याशी असलेल्या मैत्रीमुळे समोर आले आहे. या प्रकरणात विहंगची दोनदा चौकशी झाली आहे.
ईडीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरमान जैन व विहंग सरनाईक हे मित्र आहेत. या दोघांचे व्हाट्सअप चॅट ईडीला मिळाले आहे. त्या चॅटमध्ये दोघेही आर्थिक देवाणघेवाणीबाबत बोलत असल्याचे दिसून येत आहे. त्याआधारे ईडीने अरमानच्या घरी छापा टाकला होता. त्यात काही महत्त्वाची कागदपत्रे मिळाली. त्यामुळेच आता त्याला चौकशीसाठी बोलवले आहे.
गेल्यावर्षी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतर्फे टॉप्स ग्रुपच्या माजी कर्मचा-यांच्या तक्रारीवरुन कंपनीचे प्रमोटर राहुल नंदा यांच्यासह 11 जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. या एफआयआरच्या आधारे ईडीने इंफोर्समेंट केस इंफर्मेशन रिपोर्ट (ईसीआयआर) दाखल केला. 28 ऑक्टोबर, 2020 रोजी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) टॉप्स ग्रुपने तब्बल 175 कोटींनी लुबाडले आहे.
ईडीने 24 नोव्हेंबर रोजी मुंबई आणि ठाण्यात 10 ठिकाणी छापे टाकले होते. यात मुंबई आणि ठाण्यात सरनाईक आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या घर आणि कार्यालयाचा सामवेश आहे.
ईडीने ज्या दिवशी अरमानच्या घरावर छापा टाकला होता आणि त्याच दिवशी त्यांना काही कागदपत्रे मिळाली होती. त्यामुळे 11 फेब्रुवारीला अरमानला समन्स बजावून त्याला सकाळी 10 वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. परंतु अरमान वैयक्तिक कारणास्तव उपस्थित झाला नाही. त्यामुळे त्याला पुन्हा समन्स बजावण्यात आले.