पुणे -राज्यात पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तब्बल चार वर्षांनंतर आता पुन्हा अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा फेब्रुवारीमध्ये होणार आहे.
डी.एड., बी.एड. धारक उमेदवारांना शिक्षक भरतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होण्याची अट आहे. याबरोबरच अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी उत्तीर्ण होण्याचे बंधनही घातले आहे. राज्यात डिसेंबर 2017 मध्ये पहिल्यांदा अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी घेण्यात आली.
त्यानंतर पुन्हा ही परीक्षा झालीच नाही. शासन निर्णयातील तरतूदीनुसार आता फेब्रुवारी 2022 मध्ये संबंधित यंत्रणांचा समन्वय साधून सुयोग्य नियोजन अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा घेण्याचे नियोजन करावे,
असे आदेश शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव प्रविण मुंढे यांनी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना बजाविले आहेत. जानेवारी 2019 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा घेतली होती. त्यानंतर आता ही परीक्षा 21 नोव्हेंबरला घेण्याचे नियोजन आहे.