कारखान्याचे अध्यक्ष पिचड, उपाध्यक्ष गायकर यांची माहिती
अकोले (प्रतिनिधी) –अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल (आसवनी) प्रकल्पाला उत्पादन घेण्यास उत्पादन विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या गळीत हंगामापासून इथेनॉल उत्पन्न घेऊ शकू, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री मधुकरराव पिचड व कारखान्याचे उपाध्यक्ष तथा जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी दिली.
कारखान्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त कारखान्याने इथेनॉल प्रकल्प हाती घेतला होता. त्याची बांधणी पूर्ण झाली असून, उत्पादन घेण्यास इथेनॉल प्रकल्प सज्ज झाला आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळेस दिली. अगस्ती सहकारी साखर कारखाना स्थापना होऊन पंचवीस वर्षे झाली आहेत.
स्पर्धेच्या काळामध्ये शेजारील कारखान्यांच्या भावाशी स्पर्धा कायम ठेवत कारखान्याने ऊसउत्पादकांचे हित सतत साधले आहे. या कारखान्याच्या बरोबर जे कारखाने उभे राहिले होते, ते जवळपास आजारी किंवा बंद स्थितीत आहेत.
मात्र अगस्ती सहकारी साखर कारखाना आता वेगाने घोडदौड करत असून, इथेनॉल उत्पादन घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरात अधिकचा भाव टाकता येईल, अशा प्रकारची भावनाही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे संचालक मंडळाने घेतलेला निर्णय हा किफायतशीर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रत्यक्ष उत्पादन घेण्याच्या दृष्टीने जो परवाना हवा होता, तो मिळाल्याने नजीकच्या काळामध्ये कारखाना सुरू झाल्याबरोबर मोलॅसिसची निर्मिती होऊन कारखान्याला उत्पादनाबरोबरच विक्रीलाही परवाना भेटली आहे. त्यामुळे सर्वांमध्ये उत्साह आहे.
भास्करराव घुले ,कार्यकारी संचालक