मुंबई : देशासह राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान कोरोनाची दुसरी लस घेतल्यानंतर बूस्टर डोस घेण्यासाठी नऊ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र आता हा डोस सहा महिन्यांनी घेता येणार आहे. याबाबतचा निर्णय राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार गटाने घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बूस्टर डोसचे आंतर कमी करण्याची मागणी केली होती.
कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी वाढ पाहता चौथ्या लाटेचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. बुस्टर डोस मधील अंतर कमी करण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयकडे लवकरचं शिफारस केली जाणार असून त्यांची अंमलबजावणी देशात करण्यात येणार आहे.राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढतायत आहेत. पण सध्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण सापडत नाहीत. कोरोना वाढत असला तरीही राज्यात निर्बंध नाही. तसेच शाळा बंद होणार नाही, किंवा शाळेवर कुठलेही निर्बंध आणण्याचा अद्याप विचार नाही. विद्यार्थ्यांच्या लसीकरणावर भर देण्यात येणार आहे. शाळांमध्ये मुलांचं लसीकरण वाढवणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.