राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता
नवी दिल्ली : राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीमध्ये बैठकांचा जोर आजही कायम आहे. दरम्यान, कॉंग्रेस कार्यकारिणीची (सीडब्लूसी) दिल्लीत बैठक झाली. ज्यामध्ये शिवसेनेसोबत महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेला सीडब्लूसीकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटणार असल्याचे बोलले जात आहे.
दिल्लीमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये कॉंग्रेस नेते केसी वेणुगोपाल, अधीर रंजन चौधरी, अंबिका सोनी, अहमद पटेल, एके अँटोनी यांच्यासह कॉंग्रेसचे अनेक नेते सहभागी झाले होते. दरम्यान, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेची मुंबईमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीनंतर आघाडीची घोषणा केली जाऊ शकते. आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार, सीडब्लूसीच्या बैठकीनंतर कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले की, ‘राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत झालेल्या चर्चेबाबत आम्ही सीडब्ल्यूसीला माहिती दिली आहे.’
दरम्यान, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये बुधवारी तब्बल 5 तास चर्चा झाली. मध्यरात्री ही बैठक संपली. त्यानंतर, शिवसेनेबरोबर समान कार्यक्रमाबाबत फोनवरुन चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापनेचा नवा फॉर्म्युला समोर येत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अडीच वर्ष शिवसेना आणि अडीच वर्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे मुख्यमंत्री असणार आहे. तर कॉंग्रेसकडे वर्ष उपमुख्यमंत्री पद असणार असल्याची माहिती सांगितली जात आहे.