विष्णू वामन शिरवाडकर, (27 फेब्रुवारी, 1912-10 मार्च 1999) हे मराठी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लेखन केले. त्यांचा जन्मदिवस (27 फेब्रुवारी) मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषा कुळातील एक भाषा आहे. मराठी ही भारतातील 22 अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे.
2011च्या जनगणनेनुसार, आपल्या देशात मराठी भाषकांची एकुण लोकसंख्या सुमारे 9 कोटी आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा भारतातील प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. मराठी भाषेचा गौरव ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या साहित्यातूनही केलेला दिसून येतो. ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात श्री ज्ञानदेवांनी जी प्रतिज्ञा केली होती ती त्यांनी श्री ज्ञानेश्वरी सांगून झाल्यावर “अमृतानुभव’ आणि “चांगदेवपासष्टी’ हे दोन स्वतंत्र ग्रंथ निर्माण करून पूर्ण केली.
काय होती ती प्रतिज्ञा? सहाव्या अध्यायात माऊली म्हणतात- माजे बोल हे शुद्ध प्राकृत आहेत खरे; परंतु अमृताशीही पैजा लावून त्या जिंकतील अशी रसभरीत अक्षर रचना मी करीन. या ओवीत श्री ज्ञानदेवांनी पैजा असा अनेकवचनी शब्द वापरला आहे. एकच नाही तर अनेक पैजा. या तीन ग्रंथांद्वारा “मराठाची बोलु’ ने तीन पैजा जिंकल्या आहेत. श्री ज्ञानेश्वरीसारखा शांत रसाने ओतप्रोत ग्रंथ संस्कृत भाषेतही नाही तसेच जगातील कुठल्याच भाषेत नाही. श्री ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे गीतेवरील भाष्य असून ही या शांत रसामुळे या ग्रंथाला स्वतंत्र ग्रंथाचा दर्जा प्राप्त झाला आहे.
“अनुभवामृत’ म्हणजे विश्वसाक्षात्काराच्या, पूर्ण साक्षात्काराच्या शब्दातीत अनुभवांचे, शब्दांचे वर्णन करणारा ग्रंथ संस्कृतसकट जगातील कुठल्याच भाषेत असा ग्रंथ नाही. ज्ञानाच्या, अनुभवाच्या व्यक्ती करण्याची मर्यादा म्हणजे अनुभवामृत, तर चांगदेवांना पत्र लिहायच्या निमित्ताने 65 ओव्यांचा जो “चांगदेव-पासष्टी’ ग्रंथ निर्माण झाला तो म्हणजे सर्व युगातील वैज्ञानिकांशी साधलेला सुसंवाद ठरावा असा आहे. पुंजभौतिकी अर्थात कॉंटम फिजिक्सशी संबंध जोडल्याने या ग्रंथाचा उलगडा होऊ शकतो, असे मत डॉ. राजेंद्र बाविस्कर यांनी फक्त मांडले नाही तर याच विषयात त्यांनी पीएचडी प्राप्त केली. जगातील कुठल्याच भाषेत असे ग्रंथ नाही.अशा या अमृताहूनही गोड, मधुर भाषेचा महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य आणि म्हणूनच त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भरच पडत आहे. मराठी भाषा अधिक वाढावी यासाठी मराठी बांधवांनी आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी बांधवांनीही प्रयत्न करायले हवे.
अजय बाविस्कर