पुणे – कृषी विभागात गेल्या दोन दिवसांत एकूण 399 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरळसेवा भरतीने हे सर्व अधिकारी राज्य सरकारच्या सेवेत दाखल झाले आहेत. यामध्ये वर्ग-1 चे 17, वर्ग-ब-83 अधिकारी, तर 299 वर्ग ब मधील कनिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे कृषी विभागाच्या कामाला वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सोमवारी वर्ग-अच्या 17 अधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वर्ग-ब च्या 83 अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली. याच दिवशी कनिष्ठस्तर अधिकाऱ्यांची 299 जणांची यादी जाहीर करण्यात आली. वर्ग-अ मध्ये कृषी उपसंचालक, कृषीविकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, प्रकल्प उपसंचालक या पदांवर नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.
तर गट ब मध्ये तालुका कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, मोहिम अधिकारी या पदांवर नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. तर 299 कनिष्ठस्तर अधिकाऱ्यांना मंडलकृषी अधिकारी, कृषी अधिकारी यावर पदस्थापना देण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्वाधिक मनुष्यबळ असलेल्या कृषी विभागात अनेक वर्षांपासून नोकरभरती झाली नव्हती. पण, आता ती सुरू करण्यात आली आहे.