महावितरणकडून सहा महिन्यांपासून नियुक्त्या रखडल्या :
राज्यातील 327 उमेदवारांचे भवितव्य टांगणीला
एम. एस. सुतार
बावडा- महावितरण कंपनीकडून सरळ सेवा भरती अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती प्रक्रियेत पात्र उमेदवारांच्या सहा महिन्यांपासून नियुक्त्या रखडल्या आहेत. याबाबत पात्र उमेदवारांनी ऊर्जामंत्री, आमदारांना निवेदने धाडली आहेत. संबंधित मंत्र्यांचे उंबरठे झिजविले आहेत. तरीही पालथ्या घड्यावर पाणी पडले आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. राज्यातील 327 उमेदवारांना नोकरीची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
महावितरणकडून जून 2019 मध्ये कनिष्ठ अभियंता (र्गीपळीे एपसींपशशी) पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. यानुसार पात्रताधारक युवक- युवतींनी अर्ज सादर केले. दि.13 नोव्हेंबर 2029 रोजी 327 जागांकरिता परीक्षा घेतली होती. परीक्षेचा निकाल दि. 17 जानेवारी रोजी जाहीर केला. पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीची प्रक्रिया दि. 4 फेब्रुवारी रोजी पूर्ण झाली.
सहा महिने उलटूनही नियुक्त्या फाइलबंद आहेत. याबाबत कंपनीने परिपत्रक जाहीर केले नाही. यातील अनेक पात्र उमेदवारांनी आता आपली नोकरी नक्की झाली असल्याचे समजून पूर्वी करीत असलेल्या नोकऱ्यांवर पाणी सोडले. त्यामुळे महामारीच्या काळात बेरोजगारीच्या वेदना उमेदवारांसह कुटुंबीयांना सोसाव्या लागत आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पात्र उमेदवारांनी समक्ष भेटून निवेदन दिली आहेत. परंतु त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर आले नसल्याची खंत उमेदवारांनी व्यक्त केली आहे. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी आश्वासन दिले आहे.
महावितरणकडून राज्यातील पात्र 327 उमेदवारांसाठी परिपत्रक न काढल्याने उपासमारीची वेळ आली आहे. संबंधित मंत्री, आमदारांनी नियुक्त्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा.
-निलेश मिले, सराटी, ता. इंदापूर.
आजी- माजी नेत्यांचे उंबरठे झिजवले
ऊर्जामंत्री नितीन राऊत, खासदार धैर्यशील माने, मंत्री हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, नमिता मुंदडा, दत्तात्रय भरणे, सतेज पाटील, बाळुभाऊ धानोरकर, अंबादास दानवे, आमदार रोहित पवार, आमदार ऋतुराज पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आदींना उमेदवारांनी लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. या आजी-माजी नेत्यांचे पात्र उमेदवारांनी उंबरठे झिजविले आहेत. तरी कोणालाही पाझर फुटला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया उमेदवारांनी व्यक्त केली आहे.