भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबईच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नेमणूक झाली आहे. त्याबाबत…
महाविकास आघाडी सरकारला खाली खेचून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्याबरोबर भाजपचा आत्मविश्वास बळावला आहे. आता महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका समोर ठेवून, भाजपने प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे, तर मुंबईच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नेमणूक केली आहे. उपमुख्यमंत्री व विधिमंडळ पक्षनेते फडणवीस व प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे दोघेही नागपूरचे आहेत. फडणवीस ब्राह्मण, बावनकुळे ओबीसी आणि शेलार हे मराठा आहेत. या प्रकारे भाजपने जातीय बेरीज साधली आहे. विशेष म्हणजे, शेलार यांची नियुक्ती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नवी दिल्लीत केली.
मुंबई महानगरपालिकेचे बजेट 40 हजार कोटी रुपयांचे असून, काही राज्यांचेही एवढे बजेट नसते. मुंबई ही देशाची व्यापारी राजधानी आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही महापालिका स्वतःच्या कब्जात घेण्याचा भाजपचा इरादा आहे. 2017च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांत भाजपला शिवसेनेपेक्षा केवळ दोन जागा कमी मिळाल्या होत्या. दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या आणि परस्परांविरुद्ध आक्रमक प्रचार केला होता. या निवडणुकीच्या भाजपच्या यशाचे श्रेय मुख्यत्वे शेलार यांच्याकडेच जाते.
वास्तविक गेल्या वर्षी भाजपच्या बैठकीत पालिकेच्या निवडणुकांचे प्रभारीपद आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे देण्यात आले होते. परंतु त्यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा असून, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रसाद लोढा हे आता मंत्रिमंडळात गेले आहेत. त्यामुळे शेलार यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली असून, त्यांची निवड ही अत्यंत योग्य म्हणावी लागेल. आशिष शेलार हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातून 2014 व 2019 असे दोनवेळा आमदार म्हणून विधानसभेत निवडून आले. शालेय शिक्षण सुरू असतानाच ते रा. स्व. संघात काम करू लागले आणि नंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय झाले. ते बी.एस्सी. तसेच एलएलबी देखील आहेत. एवढेच नव्हे, तर क्रिकेट संघटनात्मक क्षेत्रातही ते कार्यरत आहेत. शेलार यांनी यापूर्वीही दोन वेळा अध्यक्षपद भूषवले असून, मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार वारंवार चव्हाट्यावर आणला आहे.
भाजप-शिवसेना हे युतीत एकत्र असल्यामुळे महापालिकेत विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी स्वीकारण्याचे भाजपने टाळले होते. त्यामुळे तेव्हा, आपण रखवालदाराची भूमिका स्वीकारू, असा पवित्रा भाजपने घेतला. शेलार यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी उत्तम संबंध असून, फडणवीस सरकारात उच्च शिक्षणमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ते विधिमंडळात भाजपचे मुख्य प्रतोद असून, अलीकडील काळात शेलार यांनी राज्यभरात संघटना मजबूत करण्यासाठी बरेच काम केले आहे. त्यामुळे त्यांचे प्रदेशाध्यक्ष पदासाठीदेखील नाव होते. मात्र काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या संदर्भात शेलार यांनी वादग्रस्त विधान केले होते. हे प्रकरण नंतर पोलिसातही गेले होते.
चंद्रकांत पाटील हे मंत्रिमंडळात गेल्यामुळे, नवा प्रदेशाध्यक्ष नेमणे जरूरीचे होते. गेल्या वर्षीदेखील पाटील यांना या पदावरून हटवले जाणार, अशी भाजपमध्येच चर्चा होती. काही महिन्यांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात वक्तव्य केल्यामुळे, अडचणीत येऊन त्यांना दिलगिरी प्रदर्शित करावी लागली होती. आता बावनकुळे प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे, भाजपने ओबीसी समाजातील नेत्याला मोठीच संधी दिली आहे. नुकत्याच नवी दिल्लीत झालेल्या ओबीसी परिषदेत फडणवीस यांचे भाषण झाले. त्यावेळी बोलताना त्यांनी, “राजकारणात मला तीस वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात ओबीसी मतदारांमुळेच मी वारंवार निवडून आलो आहे. त्यामुळे ओबीसींच्या सन्मानासाठी मी सर्व शक्तिनिशी प्रयत्न करेल’, असे उद्गार काढले होते.
वास्तविक बावनकुळे हे केंद्रीय भूपृष्ठवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय आहेत. गडकरी आणि फडणवीस यांचे संबंध कसे आहेत, याबद्दल नेहमीच कुजबुज सुरू असते. बावनकुळे हे फडणवीस सरकारमध्ये ऊर्जामंत्री होते. थकबाकीदारांची वीज कोणत्याही परिस्थितीत न कापण्याचे धोरण असल्यामुळे, बावनकुळे यांच्या काळात वीजमंडळाची थकबाकी प्रचंड वाढली. त्याचप्रमाणे देशातील एका बड्या उद्योगपतीने त्यांच्या विरोधात तक्रार केल्यामुळे, 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारीच नाकारली, असे बोलले जात होते. बावनकुळेंचा पत्ता फडणवीसांनीच कापला, असा आरोपही झाला. अर्थात तसे काहीही नसल्याचा खुलासा फडणवीस यांच्या वर्तुळातून केला गेला. तिकीटवाटपाचा अंतिम निर्णय दिल्लीतूनच होतो, असे सांगितले गेले.
बावनकुळे यांना संधी नाकारल्यामुळे, विधानसभा निवडणुकीत नागपूरमध्ये भाजपला फटका बसला. तसेच तेली समाज विरोधात गेल्यामुळे, नागपूर जिल्हा परिषदेची सत्ता भाजपला गमवावी लागली. पक्षाचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी भाजपने बावनकुळे यांना विधान परिषदेची आमदारकी दिली. त्यामध्ये विजय झाल्यानंतर, बावनकुळे यांनी फडणवीस यांना दृढालिंगन दिले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरारले होते. बावनकुळे 1997 व 2002 मध्ये नागपूर जिल्हा परिषदेत निवडून आले होते. तर 2004 ते 2019 या कालावधीत त्यांनी विधानसभेत कामठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. ओबीसी समाजातून भाजपला मोठ्या प्रमाणात पठिंबा असून, बावनकुळे यांच्यामुळे तो पाया आणखी वाढेल. ठाकरे सरकार असताना, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न नीट हाताळण्यात आला नाही, अशी टीका करून बावनकुळे यांनी अवघे राज्य या प्रश्नावर पिंजून काढले होते.
आगामी महापालिका, जिल्हा परिषदा आणि विधानसभेच्या सर्व निवडणुका या भाजप आणि शिंदे गट एकत्र लढवेल, अशी घोषणा बावनकुळे यांनी केली आहे. लोकसभेला दोघांचे मिळून 45 खासदार तरी निवडून आणण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. अमित शहा यांच्या प्रमाणेच शेलार आणि बावनकुळे हे दोघेही प्रचंड काम करणारे नेते आहेत. भाजपसाठी ते सेट ठरतील, यात शंका नाही.