पिंपरी – भाजीपाल्याला अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. आवक मंदावल्याने विशेषत: फळभाज्यांचे दर चढेच आहेत. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी सर्वसामान्यांच्या आवाक्यात असलेला शेवग्याचा किरकोळ बाजारातील प्रतिकिलोचा दर 200 रुपयांवर पोहचला आहे. तर भेंडी, गवार व वांग्याच्या दराने शंभरी गाठली आहे.
याशिवाय लालचुटूक आणि चवीने गोड असलेल्या देशी सफारचंदाची देखील किरकोळ बाजारात शंभर रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. तर या तीन फळभाज्यांचे दर देखील सफरचंदाची बरोबरी करत आहेत. त्याऐवजी आता सर्वसामान्यांना सफरचंद परवडू लागली आहेत.
अवकाळीचा फटका बसल्याने भाजीपाल्यांची आवक मंदावली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून फळभाज्यांचे दर वधारले आहेत. कांद्याचे व पालेभाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येत असतानाच गवार, भेंडी व वांग्याने हंगामातील आतापर्यंतचे विक्रमी दर गाठले आहेत.
मोशी येथील नागेश्वर महाराज उपबाजारात रविवारी (दि.19) शेवग्याची अवघी दोन क्विंटल आवक होऊन ठोक खरेदीचा भाव 10 हजारांवर स्थिरावला. त्यामुळे किरकोळ बाजारात 200 रुपये प्रतिकिलो दराने शेवग्याची विक्री होत आहे. भेंडीची 40 क्विंटल आवक होऊन क्विंटलला कमाल 5 हजार रुपये दर मिळाला आहे. गवारीची 11 क्विंटल आवक होऊन कमाल दर 5 हजार 500 रुपये आहे. त्याशिवाय वांग्याचा क्विंटलचा कमाल दर 4 हजार रुपये एवढा राहिला.
बाजार व आहारातून शेवगा गायब
मोशी बाजारात रविवारी शेवग्याची अवघा दोन क्विंटल आवक झाली. किरकोळ बाजारात शेवगा विक्रीस उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. तर काही ठराविक विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेला शेवगा परवडत नसल्याने सर्वसामान्यांच्या आहारातूनही शेवगा सध्या तरी गायब
झाला आहे.
फळांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात
थंडीच्या हंगामात द्राक्षे, संत्री व बारामाही उपलब्ध असलेले थाई पेरू विक्रीस उपलब्ध आहेत. तर गेल्या काही महिन्यांपासून परवडणाऱ्या देशी सफरचंदाची आवक होत आहे. थाई पेरू व संत्र्याचा प्रतिकिलोचा दर 50 रुपये, तर सफरचंदाचा दर 100 रुपये प्रतिकिलो एवढा आहे.