नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्ववभूमीवर जाहीर सभांना संबोधित करताना प्रक्षोभक भाषेचा वापर केल्याचा ठपका ठेवत निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बसपाच्या अध्यक्षा मायावती तथा अन्य काही नेत्यांवर भाषण बंदीची कारवाई केली होती.
दरम्यान, निवडणूक आयोगातर्फे करण्यात आलेल्या या कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून समाधान व्यक्त करण्यात आलं आहे. तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयातर्फे कानउघाडणी करण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाने सोमवारी दुपारी योगी आदित्यनाथ, मायावती, आझम खान तथा मनेका गांधी यांच्यावर भाषण बंदीची कारवाई केली होती.
निवडणुकांदरम्यान राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांद्वारे जात, धर्म यांबाबत माध्यमांसमोर टिप्पणी करण्यात आल्यास त्या राजकीय पक्षावर निवडणूक आयोगाने सक्त कारवाई करावी अशी मागणी करणाऱ्या एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या या कारवाईचे स्वागत केले आहे. न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या या कारवाईनंतर ‘निवडणूक आयोगाला जाग आलेली दिसतीये’ अशी टिपणी करताना आतापुरती ही कारवाई पुरेशी असून आणखी कारवाई करण्याची गरज नसल्याचे देखील म्हंटले आहे.