शारीरिक असो किंवा मानसिक दुबळेपणा नकोसा वाटतो. आजारपणामुळे दुबळेपणा आलेल्या व्यक्तीला कधी एकदा बरं होऊन नॉर्मल आयुष्य जगतोय, असं होऊन जातं.
ग. दि. माडगूळकर यांची कविता आवर्जून आठवते. “झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा फुलला पहा सभोवती आनंद जीवनाचा’ किती छान! आयुष्य सुंदर आहे यावर विश्वास ठेवला की गोष्टी सोप्या होतात. शारीरिक दुबळेपणा औषधाने भरून काढतात येतो, पण मानसिक दौर्बल्याचं काय? ते भरून यायला खूप वेळ लागतो.
गदिमा पुढे म्हणतात, “होईल ताप काही मध्यान्हीच्या उन्हाचा, अविचार सोडून असला कोल्हाळ कल्पनांचा, आस्वाद घेत सुखाने येत्या नव्या क्षणाचा’. आपल्या आसपास अनेक जण दिसतात. नको ऊन लागेल, पाऊस येईल असं म्हणत येणारा क्षण हातातून निसटू देतात. जंगलात फिरणं, डोंगर किल्ले चढणं हे करताना ऊन पाऊस न बघता बेभान होऊन चढायचे असतं.
दुबळ्या व्यक्तीचा गैरफायदा उठवला जातो. तिच्या संवेदनशीलता, मऊ स्वभावाला कमजोरी समजून इतर लोक त्यांच्या गळ्यात सगळ्या जबाबदाऱ्या टाकतात आणि या व्यक्तीही उगीच भांडण नको म्हणून हो ला हो करतात.गदिमा पुढे म्हणतात, “पुष्पास वाटते का भय उन पावसाचे आयुष्य त्यास आहे एकाच ना दिवसाचे बसून करि परी ते वर्षाव सौरभाचा”
माणसाच्या आयुष्यातही उन्हाळा पावसाळा असतो. पण म्हणून त्या प्रसंगात वाहून जायचं नसतं. फूल या सगळ्या त्रासातून आपलं सुगंध द्यायचं काम करतच असतं. तसंच माणसानं सगळ्या परिस्थितीत मन:स्वास्थ्य सांभाळून राहिले पाहिजे.
दुबळेपणा येण्याचं एक कारण दिसतं ते म्हणजे परिस्थितीला सामोरे जाण्याचं टाळणं, त्याला तोंड न देणं, हे आहे. चढउतार सगळीकडे असतात, पण ते आहे तसेच स्वीकारायचे असतात. खूप जण आधीच अडचणी कशा येतील, यश कसे मिळणार नाही हे सांगून खच्चीकरण करत असतात. अति विचाराने मन दुबळं होतं.
खूप जण एकटे असताना आपल्याला मिळालेलं अपयश, अपमान आठवत बसतात. निर्णय कसे चुकले, पैसा कसा कमी मिळाला, इतर लोक कसे पुढे गेले हे आठवून दु:खी व्हायचं, मन अधिकाधिक दुबळं करायचं. ठाम राहाणं, स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाचा शोध घेणं, स्वत:ला सिद्ध करणं हे करायलाच हवं.
किंबहुना प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले प्रसंग आलेले असतात. पण आपण सतत इतरांशी तुलना करतो त्यामुळे जे मिळाले असते त्याची किंमत नसते. आपल्याला दुबळं करणारे घटक कोणते आहेत, याचा शोध आपणच घ्यायला हवा व त्यावर उपाय शोधायला हवा.
भावनेच्या भरात वाहून न जाता वास्तवाचा विचार करायला हवा. अंध, अपंग व्यक्ती आपल्या वैगुण्यावर मात करत जग जिंकण्याची मनीषा ठेवतात. त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप असतं.
डॉ. नीलम ताटके