चार वर्षांचा माझा नातू शेजारच्या सीटवर बसला होता आणि मी गाडी चालवत होतो. एकामागोमाग दुसरा असे चारएक तरी स्पीडब्रेकर लागले. त्यासरशी तो एकदम म्हणाला, किती हे अप अँड डाउन? मी त्याच्याकडे चमकून पाहिलं पण तो निर्विकार होता. माझ्या मनात आलं- या कोवळ्या वयात त्याला हे रस्त्यावरचे अप अँड डाउन अनुभवावे लागताहेत पण पुढे जीवनात तर किती वेगवेगळ्या प्रकारचे अप अँड डाउन सहन करावे लागणार असतील याची त्याला कल्पनाही नसेल.
मी विचार करू लागलो. खरोखरीच आपलं आयुष्य हे किती चढ-उतारांनी भरलेलं असतं. किंबहुना असंही म्हणता येईल की ज्यामध्ये चढ-उतार नसतील तर ते जीवनच नव्हे. आचार्य अत्रे यांनी त्यांच्या जीवनातील चढ-उतारांचं हृदयस्पर्शी वर्णन केलं आहे. एका मोठ्या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये आर्थिक अडथळा आला व तो डब्यात जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. ते रात्री अंथरुणात तळमळत असताना अचानक दरवाजावर थाप आली. बाहेर खूप लांबून आलेले एक गृहस्थ उभे होते. त्यांना अडचणीची कल्पना असावी. काहीही न बोलता त्यांनी अत्र्यांच्या हातात एक पिशवी ठेवली आणि ते निघून गेले. पिशवीत फार मोठी रक्कम होती. अर्थात चित्रपटाचं काम सुरू झालं. पुढे त्या चित्रपटाला मोठा सन्मानही मिळाला.
इंदिरा गांधी यांना तर मोठे अप अँड डाउन अनुभवावे लागले. अचानक सत्तालाभ, पुढे युद्ध आणि प्रचंड आंतरराष्ट्रीय दबाव, युद्धात महाविजय, एकाधिकारशाहीमुळे सत्ता गमाविणे, ती पुन्हा मिळवणे, ऑपरेशन ब्लू-स्टार आणि अखेर हत्या. अमेरिकेचे सध्याचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनाही असेच एखाद्या रोलर-कोस्टरसारखे अनुभव घ्यावे लागले आहेत. सहा वेळा सिनेटमध्ये निवडून आलेले बायडेन 1988 व 2008 मध्ये राष्ट्रपतिपदासाठी लढले पण पराभूत झाले. 2009मध्ये उपराष्ट्रपती झाले आणि अखेर आयुष्याच्या संध्याकाळी 2020मध्ये राष्ट्रपती झाले. पण जीवनात त्यांनी पचवलेली दु:खं पाहिली तर आश्चर्याला पारावार राहणार नाही.
1972ला त्यांची पत्नी व मुलगी अपघातात मरण पावले. अपघातातून वाचलेला एक मुलगा मेंदूच्या कर्करोगानं निधन पावला. या सगळ्यामुळे फारसे उत्सुक नसतानाही त्यांना उमेदवारी जाहीर झाली आणि अखेर ते जिंकले. ही तर चढ-उतारांची परिसीमाच म्हणावी लागेल. म्हणून असं वाटतं की सुखाचे चार दिवस आल्यावर माणसानं सावध व्हावं. कारण सुखाचा बराच काळ उपभोगायला मिळाला की जवळपासच दु:ख टपून बसलेलं असणार हे निश्चित. तसंच दु:खाचे खूप आघात सोसल्यावर सुखासमाधानाची झुळूक नक्कीच येणार याची खात्री असायला हवी.
यशस्वी क्रिकेट कप्तान कपिल देव यांनी एकदा म्हटले होते, र्धीे लरपपीें श्रीेश रश्रश्र ींहश ींळाश पीे ुळप रश्रश्र ींहश ींळाश शळींहशी. नशीब बऱ्याच प्रमाणात यशापयशाचा समतोल राखतं हेच खरं. चढ-उतारांचा हा खेळ जर निसर्गनियमच असेल तर माणसानं त्याला सामोरे कसं जायचं? यशानं, सुखानं हुरळून जाता कामा नये आणि दु:ख उगाळीत बसू नये हे खरं पण प्रत्यक्षात आणणं कर्मकठीण.
शेक्सपिअरनं “ऍथेलो’ नाटकात म्हटलं आहे –
ढेर् ीीोप र ाळीलहळशष ींहरीं ळी
रिीीं रपव सेपश
खी ींहश पशुीं ुरू ीें वीरु
पशु ाळीलहळशष ेप
म्हणजेच दु:ख आळवीत बसणं म्हणजे दुसऱ्या दु:खाला निमंत्रण देण्यासारखं आहे. तेव्हा स्थितप्रज्ञ राहण्यातच खरा शहाणपणा आहे. स्थितप्रज्ञ होणं ही सोपी गोष्ट नाही. भावनांमध्ये गुंतलेल्या सामान्य माणसाला तसं करणं फारच अवघड आहे. उतारावर घरंगळत गेलेल्या जीवनामध्ये चढावर चढून जाण्याची उमेद कुठून आणणार?
अशा वेळी कपिल देव यांनी दिलेला व्यावहारिक विचारच मार्गदर्शी ठरतो. जीवनातही आपण सारखंच अपयश झेलत राहणं अशक्य आहे. केव्हा ना केव्हा तरी यशाचा मार्ग दिसणारच यावर श्रद्धा हवी. कपिल देव यांनी वेस्ट इंडीजला दोनदा हरवून 1983चा विश्वकरंडक जिंकून दिला खरा, पण लगेचच वेस्ट इंडीज संघ भारतात आला आणि त्यांनी जगज्जेत्या भारताला 5-0 अशी धूळ चारली. म्हणूनच त्यांचे अनुभवाचे बोल उपयुक्त आहेत.
कितीही अंधकाराची रात्र असली तरी पहाटे सूर्यकिरणं अंधकाराला छेद देतातच ना?
श्रीनिवास शारंगपाणी