साधारणतः साडेपाचची वेळ होती. 6 वाजताच्या सिनेमाची तिकिटे बुक केली होती आणि साहजिकच त्या गडबडीत मी, माझी सौभाग्यवती आणि मुलगी दुचाकीवरून चाललो होतो. ज्या दिवशी वेळेची मर्यादा असते त्या दिवशीच नेमकी वाहतुकीत गर्दी असते, असा काहीसा अनुभव त्या दिवशीसुद्धा येत होता. सायंकाळची वेळ असल्याने ट्रॅफिकची समस्या जाणवत होती.
काही ठिकाणी तर सायकल ओव्हरटेक करून पुढे निघून जाईल अशी काहीशी परिस्थिती होती. त्यात सिनेमातील हिरोची एंट्री मिस व्हायला नको म्हणून जागा मिळेल तशी गाडी पुढे धावत होती. काही अंतरावर आलो आणि पुढे स्पीड ब्रेकर लागला. मी दुचाकीचा वेग कमी करीत स्पीड ब्रेकर क्रॉस केला. त्यावेळी पुढे बसलेली माझी कन्या मला कुतूहलाने म्हणाली, “पप्पा हे असे उंचवटे कशाला असतात?’ मी तिला सांगू लागलो की, “बाळा, वाहनांचा वेग ठराविक अंतरानंतर नियंत्रित राहावा यासाठी हे असते.’
तेवढ्यात ती म्हणाली, “पण आपल्याला तर उशीर होतोय ना? मग कशाला गाडी हळू घ्यायची त्याच्यावरूनसुद्धा स्पीडने घ्या.’ तेवढ्यात पुढे अजून एक स्पीड ब्रेकर आला आणि आमच्या पाठीमागून आलेली दोन तरुणांची सुसाट दुचाकी भुर्रकन पुढे निघून गेली. माझी मुलगी आणि आम्ही हे उत्सुकतेने पाहत होतो.
पुढे जाताच सुसाट वेगाने गेलेली ती दुचाकी त्या स्पीड ब्रेकरवरून घसरली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. गाडीचे नुकसान झाले. हे दृश्य पाहताच माझी कन्या घाबरून गेली. मला म्हणाली, “पप्पा आपली गाडी हळूच जाऊद्या.’ मला तिच्या बोलण्याने हसू आले. आयुष्यात अनेक धडे हे प्रत्यक्ष अनुभवानंतरच माणसाला शहाणे करीत असतात.
त्या प्रसंगानंतर माझ्या मनात विचारचक्र सुरू होते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातही असे स्पीड ब्रेकर्स असतात. मग ते अपयश, अज्ञान, निराशा किंवा दुःख अशा स्वरूपात जीवनात येतात. अशावेळी आपण सावध होऊन एकतर एखाद्या ध्येयाचा त्याग करतो किंवा हाती घेतलेली गोष्ट तशीच सोडून देतो. त्या गोष्टीच्या वाट्याला पुन्हा जात नाही. परंतु जिद्दी आणि सातत्य ठेवणारी व्यक्तिमत्त्वे मात्र अशा स्पीड ब्रेकरचे अगदी सहज व्यवस्थापन करतात आणि त्यात अंतिम ध्येयापर्यंत पोहोचतात. आयुष्यात जे चढउतार येतात ते म्हणजेच स्पीड ब्रेकर्स असतात वगैरे आपण सुविचारांत ऐकले, वाचले आहे. परंतु हे स्पीड ब्रेकर्स आयुष्यात का येतात? या प्रश्नाने मला अस्वस्थ केले होते.
खूप विचारांती मला याचे उत्तर मिळाले. ते म्हणजे असे स्पीड ब्रेकर्स आपल्या आयुष्यात येतात ते आपल्याला आपले आत्मपरीक्षण करता यावे म्हणून. स्पीड ब्रेकर्स आपल्या अनियंत्रित गतीला नियंत्रित करतात आणि ते दुर्घटना होण्यापासून बचाव करतात. ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना पुढच्या टप्प्यासाठी आपल्याला काय करायला हवे? मागील टप्प्यातील अनुभवांची सांगड कशी घालता येईल? ध्येयप्राप्तीच्या प्रवासातील अडथळ्यांना कसे लीलया पार करता येईल? यासाठी मला अजून काय करावे लागेल? असे आत्मपरीक्षणात्मक अनेक प्रश्न पडण्यासाठी हे स्पीड ब्रेकर्स उपयोगी ठरतात.
ध्येयप्राप्तीसाठी आपल्याला उद्दिष्टे आधी ठरवावी लागतात; अन्यथा अनियंत्रित वेग हा अनेकदा आपल्या यशासाठी घातक ठरत असतात.याबाबत लाकूडतोड्याची वाचनात आलेली गोष्ट अगदी तंतोतंत लागू होते. एका गावात दोन लाकूडतोडे होते. दोघेही अतिशय कष्टाळू होते, त्यापैकी एका लाकूडतोड्याला हाती दिलेले काम पूर्ण करायला दिवस लागत असे, तर दुसरा लाकूडतोड्या मात्र तीन-चार तासांत तेच काम पूर्ण करीत असे. एके दिवस मालकाने दिवसभर राबणाऱ्या त्या लाकूडतोड्याला कामावरून काढून टाकले.
साहजिकच खूप मेहनत करूनही त्याला दिवस पुरत नसे. दुसरा मात्र वेळेत काम उरकून दुपारीच निघून जात असे. आता या दोघांत एकच फरक होता आणि तो म्हणजे स्पीड ब्रेकरचा. एक लाकूडतोड्या न थांबता राबून लाकडे तोडत असे. परंतु दुसरा मात्र स्पीड ब्रेकर लावून हत्याराला धार करून पुन्हा कामास लागत असे. ही आत्मपरीक्षणाची धार म्हणजेच पुढच्या टप्प्यासाठी केलेली तयारी. किंबहुना घेतलेला स्पीड ब्रेकर.
आयुष्यात कोणतीही गोष्ट करताना स्वतःला अधिक कार्यक्षम बनविण्यासाठी ठराविक काळानंतर आत्मपरीक्षण करावेच. आपल्यातील जमेच्या बाजू, कमकुवत बाजू, आपली क्षमता, आपली कौशल्ये याबाबत विचार करावा. मगच पुढील झेप घेण्यासाठी सुसज्ज व्हावे. आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर आपण आत्मपरीक्षणाचा स्पीड ब्रेकर समजून घ्यायलाच हवा.
सागर ननावरे