दिसामाजि काहीतरी ते लिहावे। प्रसंगी अखंडित वाचीत जावे।। अशी रामदासांनी आपल्याला शिकवण दिली आहे. मला वाटतं, अलीकडे काहीतरी लिहिण्याचा त्यांचा उपदेश बरेचजण पाळताहेत आणि मोबाइल, गप्पा, टीव्ही, फेसबुक यांच्या नादात वाचायचे मात्र राहून जाते आहे का? व्हॉट्सऍपवरचा त्रोटक, तात्पुरता मजकूर म्हणजेच वाचनलेखन झाले आहे का?
काहीजणांच्या बाबतीत असं होत असलं तरी मनःपूर्वक वाचणारेही कमी नाहीत. वाचनातून जे समाधान मिळतं ते दुसऱ्या कशातूनही मिळत नाही असा माझा अनुभव आहे. वाचनानं आपलं जग विस्तारतं. वेगवेगळ्या प्रकारांनी विचार करायला माणूस प्रवृत्त होते. कथा, कादंबरी, नाटक, कविता, चरित्र, आत्मचरित्र, इतिहास, संतसाहित्य, तत्त्वज्ञानपर विचार, विज्ञान, कला, सामाजिक घडामोडी… यातलं ज्याला जे आवडेल ते त्यानं वाचावं. वाचनातून जग आणि माणसं समजायला मदत होते. आपला भवताल कळतो.
गेल्या काही महिन्यांमधे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. या काळात पुस्तकनिर्मिती, विक्री, साहित्यिक गप्पा, प्रकाशन समारंभ, ग्रंथालयं, पुस्तक-जत्रा, साहित्य संमेलनं सारं सारं बंद झालं आणि पुस्तकप्रेमींची अक्षरशः उपासमार झाली. नंतर दुकानं, हॉटेलं चालू झाली. पण सगळीकडे असं उदास वातावरण असताना, माणसाला दिलासा देणारी पुस्तकांची दुकानं, ग्रंथालयं मात्र बंद ठेवलेली होती.
पाश्चात्य देशात, केरळमधे मॉल्स चालू झाले, तेव्हाच पुस्तकांची दुकानंही उघडली. त्या वेळी अनेकांच्या लक्षात आलं असणार की, अन्न, वस्त्र, निवारा या गरजांइतकीच माणसाला वाचनाची गरज भासते. म्हणून ती जीवनावश्यक गरज मानली जायला हवी. नाटक आणि दिवाळी अंक यांच्याशी तर मराठी माणसाचं घट्ट नातं. मागील वर्षी दिवाळी अंक प्रकाशित झाले तेव्हा त्या दिवाळी अंकांसाठी एवढी झुंबड उडाली होती की, काही दिवाळी अंक संपून गेल्यामुळे वाचकांना विकत घेता आले नाहीत. कोविडच्या काळात कोणावरही अवलंबून न राहता आपले आपले वाचन करून आनंद मिळवण्याची जादू अनेकांना नव्याने कळली.
पुस्तक विकत घेताना जगातली अत्यंत अमूल्य गोष्ट आपल्याला आता मिळणार आहे असा पुस्तकवेड्या वाचकाला अभिमान आणि उत्सुकता वाटत असते. वाचायला लागलं की वाचक आणि ते पुस्तक यांचं एक वेगळं नातं तयार होतं. लेखकानं साकारलेलं जग वाचकाच्या डोळ्यापुढे उभं राहत असतं. त्यात स्वतः वाचक आपल्या परीनं रंग भरत असतो. कल्पनेनं त्याचा अनुभव घेत राहतो. एकदा आपले आवडते पुस्तक हाती आले की, मग कोणत्याही अडचणीची, त्रासाची मातब्बरी वाटत नाही.
तहानभूक हरपून वाचनवेडे लोक वाचतच राहतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः सांगितलेलं आहे की, पोटाला चिमटा घेऊन मी काही पुस्तकं विकत घेतली आहेत. सतीश काळसेकर यांनी “वाचणाऱ्याची रोजनिशी’ या पुस्तकात वाचनाविषयीचे त्यांचे रोचक अनुभव लिहिले आहेत. तसंच अलीकडेच प्रकाशित झालेल्या “पुस्तकनाद’ या पुस्तकात जयप्रकाश सावंत यांनी या विषयावर उत्तम मंथन केले आहे. पुस्तक-वाचनाचा मुख्य फायदा हा होतो की, एका जागी बसून एखाद्या विषयामधे गांभीर्यपूर्वक गुंतण्याची अनुभूती मिळते. सैरभैर होणारे मन एकाग्र करण्याची सवय लागते. एकदा या वाचनानंदाची गोडी लागली की, क्षुल्लक, वरवरच्या गोष्टींमधे रस वाटेनासा होतो.
ज्यांना ही गोडी चाखता येते, ते भाग्यवान. पण जे या आनंदापासून वंचित आहेत, त्यांचे काय? त्यांना या मधाचे बोट एकदा चाखवायला हवे. त्यासाठी काही खटपटी मंडळी प्रयत्नही करीत आहे. उदाहरणार्थ, प्रदीप लोखंडे यांनी अनेक गावांमधे मुलांसाठी वाचनालये सुरू केली आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा “ग्रंथ आपल्या दारी’ उपक्रमही लोकप्रिय झाला आहे. पुण्याच्या आबासाहेब अत्रे प्रशालेतील ग्रंथालयाने पुस्तकभेट योजनेतून देणगी स्वरूपात गेल्या वीस वर्षांत जवळपास पंचवीस लाख रुपयांची वीसेक हजार पुस्तके समाजातील साहित्यिक, कलावंत यांच्याकडून भेट म्हणून मिळवली व ती सर्वांना उपलब्ध करून दिली आहेत.
गावागावांमधे एसटीतून पाठवून दिली आहेत. अमृत खानविलकर हा तरुण अनेक उत्तम मोठ्या पुस्तकांचे संक्षिप्त स्वरूपात रेकॉर्डिंग करून पाठवून देत असतो. त्यातून मूळ पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाटते व ती पुस्तके वाचली जातात. त्याचे हजारो फॉलोअर्स आहेत. तसंच अक्षय चव्हाण कर्जत तालुक्यातील बार्डी या छोट्या गावात जिद्दीनं ग्रंथालय चालवतो आहे. त्यानंही अनेकांकडून पुस्तकं मिळवून वाचकांना उपलब्ध करून दिली आहेत.
पुण्यातील काही गणेशोत्सव मंडळांनी कोविडच्या काळात प्रकाशक व लेखक यांच्याकडून लहान मुलांसाठी उत्तम पुस्तके जमा करून घरोघरी जाऊन वाटली आहेत. पुणे नगर वाचन मंदिर, पुणे मराठी ग्रंथसंग्रहालय यांनीही आता घरपोच पुस्तक योजना सुरू केली आहे. देणारे हात भरपूर आहेत. “अखंडित वाचन’ करणारे वाढतील तर वाचनसंस्कृती समृद्ध होईल आणि पर्यायानं देश व समाज सुसंस्कृत होईल. मूलभूत गरजा भागल्यानंतर माणसाची सांस्कृतिक भूक भागली तरच तो खऱ्या अर्थानं समाधानी राहू शकतो.
ग्रंथांशी, पुस्तकांशी निगडित असणारं सांस्कृतिक विश्व ही राष्ट्राच्या समृद्धीची खूण मानली जाते. पुस्तकसंस्कृती जेवढी अधिक संपन्न, तेवढा तो देश आणि समाज सुसंस्कृत मानला जातो. अलीकडे वेगवेगळ्या देशांमधला, राज्यांमधला हॅपिनेस इंडेक्स मोजला जातो. माणसाच्या आनंदाचे निकष ठरवताना त्यात “सांस्कृतिक विश्वाचा अनुभव घेता येणं’ हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. आपला हॅपिनेस इंडेक्स किती आहे, हे आता आपणच मोजून पाहू या आणि तो वाढवण्याचा प्रयत्न करू या.
माधुरी तळवलकर