1962-63 साल. वामन तिसरी-चौथीत. बापाची बदलीची नोकरी. बाप तालुक्याच्या गावी बदलून गेला. घरी कर्मठ वातावरण. शिंप्याच्या गल्लीत तीन खोल्यांची एैसपैस जागा भाड्याने मिळाली. वामनची शाळा जवळच. तो काळ शिकवण्या, दप्तराचे पाठीवर ओझे असा नव्हता. चारला शाळा सुटली की वामन दप्तर घरी टाकून खेळायला धूम ठोकायचा. विटीदांडू, लगोऱ्या, आबाधाबी, आटापाट्या खेळून दिवेलागणीला न चुकता घरी हजर.
दोस्त कंपनीही भरपूर. शिरप्या, हणम्या, गोंद्या, हिरामण सगळेच हसून खेळून. वार्षिक परीक्षा आणि त्याचा ताण ह्या गोष्टी माहीत नसलेली ही पिढी. गल्लीतले सगळे कष्टकरी वर्गात मोडणारे. कोणाचे शिंप्याचे दुकान, कोणी वाणी, कोणी फिरस्ता. सगळेच एकोप्याने राहायचे. एकटा वामनचा बाप तहसिलदार. बाकीचे बापालाही आदरानेच वागवायचे.
वामनच्या वयाचे मुलांना 5-7 वर्षांनी मोठी भावंडे होतीच. त्यांचा कंपू वेगळा. हणम्याची नवी वहिनी अचानक गेली. सगळेच हळहळले. त्या दिवशी मुले गल्लीत खेळली नाहीत. मे महिन्याचे अखेरचे दिवस. दुपारीच 12 चे सुमाराला अचानक वळवाचा पाऊस पंचक्रोशीत सुरू झाला. पाण्याचे लोटच्या लोट. पोर हणम्याच्या प्रशस्त वाड्यात खेळत होती. हणम्याचे घरी चिंता होती. एक वाजला. हणम्याचे मोठ्या भावाने व त्याच्या दोन-तीन मित्रांनी ह्या मुलांना हाकारले. “चला जेवायला’ मुलेच ती. त्याकाळी मोठ्यांनी सांगितले की ऐकायचे असे व्हायचे.
सगळेच गल्लीतले एकमेकांना ओळखणारे. शिरप्या, गोंद्या, हिरामण, वामन सगळेच हणम्याच्याकडे जेवायला बसले. नवखे काहीच नव्हते. जेवायला गल्लीतले अजूनही होते. मित्रांचे बापही होते. वामनचे वडील नव्हते. वामनला आणि दोस्तांना जेवायचे एवढेच कळले. हणम्याच्या बापाने हात जोडून सगळ्यांचे स्वागत केले. या बसा. वामनला काहीतरी वेगळे जाणवत होते पण लहान वयामुळे कळत नव्हते. जेवताना उदबत्त्या नव्हत्या. वाढणाऱ्या घरातल्या बायका पण हसतमुख नव्हत्या. जेवायला सुरुवात करताना पुंडलिक वरदा झाले नाही.
जेवताना वयस्क लोक एका बाजूला होते. ते दबक्या आवाजात बोलत होते. पावसाने घोटाळा केला. अन्न वाया जाणार अशी वाक्ये होती. तेवढ्यात वयस्क लोकांनी गुलाबजाम करपल्याची तक्रार केली. हणम्याचा बाप हात जोडून अजीजीने म्हणाला, “”सगळे घरी खपून केले आहे. एक डाव सांभाळून घ्या. पुन्हा असे व्हनार नाही.” वयस्कांनी माना डोलावल्या व हणम्याच्या बापाला उदारमनाने माफ केले. बाकीचे पदार्थांवर सगळ्यांनीच ताव मारला. बच्चे कंपनी घाईघाईने जेवून ढेरीला हात पुसून पुन्हा खेळायला पळाली. संध्याकाळी वामन घरी आला. घरात वातावरण बदललेले. त्याची आई, आत्या, मावशी त्याच्याकडे खाऊ का गिळू नजरेने बघत होते पण बोलत काही नव्हते. वामनचा बाप सातला घरी आला. हातपाय धुतले. त्या कर्मठ माणसाने सायंसंध्या केली. वामनची तक्रार झाली. बापाने गरागरा डोळे फिरवले. हातात बेत घेतला. वामनची यथेच्छ धुलाई झाली. “त्या लोकांच्या दहाव्याच जेवायला जातो?’ वामन्याची पाठ सुजली. शेवटी शेजारच्या रखमाआजी मधे पडल्या. “अहो, त्या पोराला तुमचे रितीरिवाज कळायला टाइम हाय. नका मारू.’
दोन दिवस वामन पालथा. मावशी पाठीला तेल, हळद लावत होत्या. वामनने जेवायचा धसकाच घेतला. वर्षांमागून वर्षे गेली. वामनचा वामनराव झाला. तो बॅंकेत चिकटला. लग्न झाले. नातू पाहून वामनच्या बापाने डोळे मिटले. वामनराव कुठे जेवायला जात नाहीत हे बॅंकेत सर्वांना कळले. वामनच्या बापाने इहलोकीची यात्रा संपवली. वामनरावांनी सर्व यथासांग पार पाडले. आईने दहाव्याची गोष्ट काढली. वामनची पाठ इतके वर्षांनी पुन्हा दुखू लागली. “”आई मी दहाव्याच जेवत नाही” वामनराव फिस्कारले. आई गप्प. आठव्या दिवसाचे रात्री वामनरावांना भयंकर स्वप्न पडले. बाप पुन्हा बेत घेऊन स्वप्नात आला. “”वामन्या माझ्या दहाव्याला जेवला नाहीस तर पुन्हा मार खाशील” वामनराव ओरडत उठले. बायकोने पाणी आणले. बाबांची फार आठवण होते का विचारले.
दहाव्याला वामनराव फुकाट जेवले.
श्रीकृष्ण केळकर