पश्चिम बंगालमधील भामुरिया खेड्यातील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या, अभ्यासात रस नसलेल्या व आठवी नापास झालेल्या आणि सायकलवरून मासळी विकणाऱ्या एका पोऱ्याने अब्दुल करीम तेलगीप्रमाणेच झटपट प्रचंड श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यानेही तेलगीप्रमाणे अवैध मार्ग पत्करून खरोखरच पूर्व भारतातील “कोळसा माफिया डॉन’ म्हणून कुप्रसिद्धी मिळवली आणि प्रचंड पैसा कमवला. या डॉनचे नाव अनुप माझी ऊर्फ “लाला!’ सध्या 20 हजार कोटी रुपयांच्या कोळसा घोटाळा प्रकरणामुळे लाला चर्चेत आला आहे.
साधारण तीन दशकांपूर्वी अब्जावधी रुपयांच्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्याने संपूर्ण देशाला जबरदस्त हादरा दिला होता. बेळगाव जवळच्या खानापूरच्या रेल्वेस्टेशनवर केळी विकणाऱ्या एका मुलाने झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहिले होते आणि तो या बनावट स्टॅम्पपेपर घोटाळ्याचा सूत्रधार बनला आणि खरोखरच अतिश्रीमंत बनला आणि शेवटी पकडला गेला. त्याचे साम्राज्य उखडले गेले आणि तुरूंगवास भोगताना त्याचा मृत्यू झाला. त्याचे नाव होते अब्दुल करीम तेलगी! आता अशाच प्रकारचा आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. हा आहे 20 हजार कोटी रुपयांचा कोळसा घोटाळा!
अलीकडेच हा कोळसा घोटाळा उघडकीस येऊन त्याला अटक करण्यात आली. पण तो सध्या जामिनावर बाहेर आहे. त्याचे नाव आहे अनुप माझी ऊर्फ लाला. पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड येथील कोळसा पट्ट्यातील गैरप्रकारांवर अनेक बेबसिरीज निघालेल्या आहेत. त्याचप्रमाणे चासनाला खाणदुर्घटनेवरील अमिताभ बच्चनचा “काला पत्थर’ हा चित्रपट 1975 च्या दरम्यान गाजला होता. तशाच प्रकारे आता अनुप माझीचा कोळसा घोटाळा गाजत आहे. सर्वसाधारणतः इतक्या मोठ्या घोटाळ्यांमध्ये इतर गुन्हेगारांप्रमाणे राजकारणी, पोलीस अधिकारी, सरकारी नोकर हे गुंतलेले दिसून येतात. श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहणे हा काही गुन्हा नाही, पण गैरमार्गाने श्रीमंत होणे हा गुन्हा निश्चितच आहे. कारण त्यातून देशाची आणि जनतेची लूट होते.
भामुरीया या खेड्यामध्ये अनुप माझीचे घर आहे. त्याचे वडील ईस्टर्न कोलफिल्ड लि. कंपनीत (इसीएल)साधे कर्मचारी होते. अनुपला चार भाऊ आणि तीन बहिणी आहेत. मासळी विकणारा अनुप भुरटा कोळसा चोर म्हणूनही ओळखला जात होता. कालांतराने अनुप माझीने थोडा पैसा जमवून चार मित्रांच्या सहाय्याने कोळशाच्या छोट्या विटा बनवण्याचा छोटा कारखाना सुरू केला. तिथूनच त्याच्या कोळसा तस्करीच्या आणि अवैध खाणकामाच्या व्यवसायाला सुरुवात झाली. त्याला जयदेव मंडल आणि इनामुल हक्क या इतर तस्करांचीही साथ मिळाली.
विशेष म्हणजे कृष्ण मुरारी कोयल या कोळसा माफिया डॉनचा अस्त होत असतानाच अनुप माझी उर्फ लाला या 42 वर्षीय डॉनचा उदय झाला. प. बंगालचा कोळसा खाणींचे क्षेत्र बर्धमान, बांकुरा, बीरभूम आणि पुरुलिया या चार जिल्ह्यात पसरले आहे. यापैकी पुरुलिया जिल्हा 1995 मध्ये किम डेव्ही नामक विदेशी इसमाने विमानातून बेकायदेशीररित्या शस्त्रे (आर्मस ड्रॉप) टाकल्याच्या प्रकरणामुळे एकदम प्रकाशात आला होता.
या पट्ट्यात कोळसा चोरी आणि बेकायदेशीर खाणकाम गेली कित्येक वर्षे सुरू आहे. इथे इस्टर्न कोलफील्ड लिमिटेड कार्यरत आहे. प.बंगालच्या संपूर्ण कोळसा क्षेत्रात उच्च प्रतीचा कोळसा मिळतो. हा कोळसा अत्यंत ज्वलनशील आहे. प्रामुख्याने वीज निर्मितीसाठी या कोळशाचा वापर केला जातो. जमिनीखाली केवळ 10-20 फुटावर कोळसा मिळतो. बेकायदेशीर खाणकाम करणारे “रॅट होल’ (उंदराचे बिळ) पद्धतीचा म्हणजेच केवळ एकच माणूस आडवा आत जाईल एवढ्या आकाराचे भुयार खोदून कोळसा काढतात. यामध्ये प्राणहानी होऊ शकते.
(मेघालयमध्ये 4-5 वर्षांपूर्वी एका खाणीतील रॅट होलमध्ये पाणी जाऊन जीवितहानी झाली होती. त्यावेळी रॅट होलमधील प्रेते काढण्यासाठी कित्येक महिने लागले होते. ही दुर्घटना गाजली होती.) त्यासाठी एका माणसाला दिवसाला 300 ते 500 रुपये दिले जातात. ही माणसे पैशासाठी किंवा माफियाच्या धमकीमुळे हा धोका पत्करतात. पण अनुप माझी सरळ जेसीबी आणि एक्सकॅंव्हेटरसचा वापर करून कोळसा उत्खनन करतो आणि हा सर्व उद्योग तो रात्रीच्या वेळी करतो.
इसीएल वैध दरानुसार टनामागे साडेचार हजार रुपयांनी उच्च प्रतीचा कोळसा विविध कंपन्याना विकते. तर अनुप माझी बेकायदेशीररित्या काढलेला हाच उच्च प्रतीचा कोळसा टनामागे दोन हजार रुपयांनी विकतो. त्यामुळे कंपन्या हा स्वस्त दरातला कोळसा घेतात. अर्थात ही मीडियातून प्रसिद्ध झालेली माहिती. तर लिलावात हा उच्च प्रतीचा कोळसा टनामागे सहा हजार रुपयांनी विकला जातो.
गेल्या 15 वर्षांमध्ये अनुप माझीचा हा अवैध व्यवसाय इतका विस्तारला आहे की त्यामधून त्याने अफाट संपत्ती कमावली आहे. माझीचे व्यवसायाचे मुख्यालय भामुरीया गाव असले तरी पूर्वेकडील इतर राज्यांमध्ये त्याचा व्यवसाय पसरलेला आहे. त्याच्या अनेक बनावट कंपन्या, ट्रक डेपो, अर्धा डझन बंगले, फार्म हाउस, दोन लक्झरी रिसॉर्ट आणि एक इंटरनॅशनल स्कूल वगैरे स्थायी मालमत्ता आहे. त्याचे राजकारणी, सरकारी नोकर, पोलीस कर्मचारी, अधिकारी वगैरेंशी साटेलोटे आहे.
त्याने स्थानिक युवकांना आपल्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या दिलेल्या आहेत. स्थानिक लोकांच्या अडीअडचणीला तो धावून जातो. त्यामुळे तेथे त्याची “रॉबिनहूड’ अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. भामुरीया गाव कधीकाळी कच्चा झोपड्या आणि धुळीने माखले गेले होते, ते आता लालाने चकाचक केले आहे.
आसनसोल, बांकुरा, पुरुलिया, बीरभूम आणि शेजारील झारखंड राज्यातील वाहतुकीच्या मार्गावर त्याची दहशत आणि मक्तेदारी आहे. तो उच्च प्रतीचा कोळसा 75 स्टील आणि आयन स्पांज युनिट्स पुरवतो. बेकायदेशीर खाणकाम आणि कोळसा वाहतुकीसाठी त्याच्याकडे किमान 700 ट्रकचा ताफा आहे. लॅपटॉप आणि कॉम्प्युटरद्वारे दलाली देण्यासाठी तो कोड नेम्स वापरतो. संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी लालाने आपल्या गावामध्ये सर्वत्र सीसीटीव्ही बसवून घेतले आहेत वगैरे माहिती उघड झालेली आहे. या बेकायदेशीर कोळसा व्यवसायामध्ये अपहरण, हत्या, खंडणी उकळणे असे प्रकार सातत्याने घडत असतात.
गेली 15 वर्षे अनुप माझीचे साम्राज्य राजकीय वरदहस्तामुळे अबाधित होते. त्याच्यावर आता हातोडा पडला आहे. गेल्यावर्षी इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडने सीबीआयकडे पहिली तक्रार केली. आपल्या कोळसा खाणक्षेत्रात अनुप माझीची टोळी अवैध कोळसा खाणकाम आणि तस्करी करते, असे या एफआयआरमध्ये नमूद होते. 2020-21 च्या दरम्यान 597 एफआयआर फाईल झाले आणि त्यातून 28 लोकांना अटक झाली. त्यानंतर सीबीआय, इन्कमटॅक्स, डीआरआय, ईडी अशा सगळ्याच तपास यंत्रणा माझीच्या मागे लागल्या.
त्याच्या अनेक आस्थापनांवर धाडी घातल्या गेल्या. काही कोटी रुपये आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली. असे सांगतात की माझी आणि त्याची टोळी गेली चौदा वर्षे पोलिसांना झुकांडी देत होती. 2006 पासून पोलीस त्यांच्या मागावर होते. जेव्हा पोलीस पथके माझीच्या टोळीला पकडायला जायची, त्यावेळी माझी आपल्या साथीदारांसह परदेशी पळून जायचा. तो सिंगापूर, बर्लीन, जीनिव्हा, लंडन आणि दुबई येथे दडून बसत असे. पण या खेपेस धनबादचे पोलीस प्रमुख विक्रम मिंझ यांनी त्याला सापळा रचून शिताफीने पकडले. आशियातील सर्वात जुन्या रस्त्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रॅंड ट्रंक रोड वर मिंझ यांनी बनावट ट्रॅफिक जामचा आभास निर्माण केला. हा मार्ग बांगलादेश, भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांना जोडतो.
मिंझ यांचे पथक दुर्गापूर, आसनसोल आणि धनबाद येथील कोळसा खाणीतून काढलेल्या बेकायदेशीर कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रक ताफ्याची वाट पाहत थांबले. जेव्हा हा ताफा जवळ आला तेव्हा त्यांनी तो थांबवला आणि ट्रक ड्रायव्हर्स, क्लिनर यांना ताब्यात घेतले. त्यातील माल जप्त केला. 19 नोव्हेंबर 2020 रोजी ही कारवाई झाली. अटक केलेल्यांकडून पोलिसांना कोळसा तस्करी कुठे आणि कशी चालते आणि त्या मागचा मुख्य सूत्रधार कोण आहे, ही सगळी माहिती मिळाली. त्यानंतरच अनुप माझीला अटक करण्यात आली आणि त्याने आपल्या कबुलीजबाबात अवैध व्यवसायासाठी प्रभावी राजकारण्यांना, सरकारी नोकरदारांना भरभक्कम लाच देत होतो अशी लेखी कबुली दिली. तो ज्येष्ठ राजकारण्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना महिन्याला 100 कोटी रुपये लाच स्वरूपात वाटत असे.
एकट्या आसनसोलमध्ये साडेतीन हजार बेकायदेशीर कोळसाखाणी आहेत. मग इतर ठिकाणी किती असाव्यात याची कल्पना करा. माझीच्या बेकायदेशीर कोळसा खाणी आणि विविध कंपन्यांमध्ये 60 हजार कर्मचारी आहेत. तो आपला पैसा चित्रपट, विदेशातील कॅसिनोमधील जुगार आणि धार्मिक उत्सवांसाठी खर्च करीत असे. राज्यातील फुटबॉल क्लबला तो आर्थिक मदत करायचा. शिवाय आपल्या भामुरिया या गावांमध्ये तो दुर्गा महोत्सव मोठ्या प्रमाणात आयोजित करायचा. त्याचा शुभारंभ दरवर्षी बॉलीवूडमधील एखादा मोठा कलाकार येऊन करायचा. या उत्सवाला बडे बडे लोक येऊन जायचे.
तपास यंत्रणांनी अनुप माझीच्या केलेल्या चौकशीतून वरील माहिती उघड झाली आणि त्यामध्ये काही राजकारण्यांची नावे गोवली गेली. सीबीआयने या कोळसा घोटाळ्याप्रकरणी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी, कायदामंत्री मलय घटक व इतर संशयितांची चौकशी केली. या चौकशीतून अभिषेक बॅनर्जी यांची पत्नी रुजिरा यांचेही नावही पुढे आले आहे. फेब्रुवारीमध्ये प. बंगालमध्ये निवडणुकीच्या दरम्यान रुजिराला चौकशीसाठी सीबीआयने नोटीस पाठवली होती.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार सूडबुद्धीने हेतुपूर्वक ममता बॅनर्जी यांच्या कुटुंबीयांना या कोळसा घोटाळ्यामध्ये गुंतवत असल्याचा आरोप तृणमूल कॉंग्रेसने केला आहे. प. बंगालमध्ये कोळसा घोटाळे नवीन नाहीत. अगदी कम्युनिस्ट सरकारच्या काळातही ते होत होते. त्यावेळीही सीबीआयकडे तक्रारी गेल्या होत्या. त्यावेळी सीबीआयने का कारवाई केली नव्हती? आणि आताच का त्यांना एकदम उपरती झाली? असा सवाल मलय घटक यांनी केला आहे.
दरम्यान अनुप माझीने एप्रिलमध्ये सर्वोच्च न्यायालयात जाऊन आपली अटक टाळली, पण जेव्हा बोलावले जाईल त्यावेळी हजर राहिले पाहिजे अशी अट त्याला घालण्यात आली आहे. या कोळसा घोटाळ्यातील संशयित म्हणून आतापर्यंत चोवीस वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि दोन जिल्हा मॅजिस्ट्रेट यांची नावे सीबीआयने नोंद करून घेतलेली आहेत. नारदा लाच घोटाळा, शारदा चिटफंड घोटाळा आणि आता कोळसा घोटाळ्याची काळी गाथा कुठपर्यंत पोहोचते ते पाहायचे!
– प्रसाद वि. प्रभू