प्राचीन धर्मग्रंथांत एक सुंदर उपदेश दिला आहे आणि तो म्हणजे “जशी दृष्टी तशी सृष्टी’. म्हणजे तुम्ही ज्या नजरेतून या विश्वाला पाहता ते विश्व तुम्हाला तसेच दिसते. हे अवघे विश्व कसं आहे, यापेक्षा ते तुम्हाला कसं हवं आहे, हे महत्त्वाचं आहे. एखाद्या वस्तूकडे, व्यक्तीकडे, त्याच्या प्रवृत्तीकडे किंवा प्रसंगाकडे कसे पाहतो यावर त्याचे मोल आपण आपल्या मनात तयार करीत असतो.
आपल्या डोळ्यांचा इलाज आपण डॉक्टरांकडे जाऊन करू शकतो. परंतु आपल्या दृष्टिकोनाचा इलाज करण्यासाठी कोणत्या दवाखान्यात जावे लागेल? दृष्टिदोषाप्रमाणे दृष्टिकोनाच्या दोषांसाठी कुणी डॉक्टर मिळेल काय? मुळात काल्पनिक विश्वात नेणाऱ्या या गोष्टींना वास्तव जीवनात उतरविणे अशक्यच. परंतु या अशक्य गोष्टी शक्य तेव्हाच होतील जेव्हा व्यक्ती त्यादृष्टीने प्रयत्न करेल. कावीळ झालेल्या व्यक्तीला ज्याप्रमाणे सर्व पिवळे दिसते. अगदी त्याचप्रमाणे मनाला उणिवांची कावीळ झाली असेल तर प्रत्येक गोष्टीत काळेबेरे दिसते. अशावेळी आपणच आपल्या मनाचे, स्वभावाचे डॉक्टर व्हायला हवे. यातूनच एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची आपली नजर, दृष्टिकोन बदलेल.
एका हत्तीच्या मोठ्या पुतळ्याला जर डोळे बांधून स्पर्श केला तर.. सोंडेला हात लागला तर मोठा पाइप वाटेल, पायाला मोठा ओंडका वाटेल, शेपटी सापासारखी भासेल, म्हणजे आपण जर परिस्थितीला एका कोनातून बघितलं आणि त्यालाच दुसऱ्या बाजूला बघितलं तर परिस्थिती वेगळीच भासेल. याबाबत इसापनीतीची एक गोष्ट आपल्याला बरेच काही शिकवून जाते.
फार पूर्वी एका राज्यात एक अपंग राजा राहात होता. ज्याला एक डोळा आणि एक पाय नव्हता. एके दिवशी राजाने राज्यात सर्व चित्रकारांना बोलावले आणि त्याचे एक सुंदर चित्र काढायला सांगितले. चित्र काढणाऱ्या चित्रकाराला दरबारात हजार सुवर्णमुद्रा देण्याचे घोषित केले. सर्व चित्रकार पेचात पडले. अपंग राजाच्या व्यंगांचे चित्र कसे दिसेल? राजाला न आवडल्यास आपल्याला मृत्युदंड होईल. या विचाराने सर्वजण पुरते भांबावले होते. त्या सर्वांनी राजाला चित्र काढण्यासाठी नम्रपणे नकार दिला. परंतु त्यातील एक वयोवृद्ध चित्रकार समोर आला आणि त्याने हे आव्हान स्वीकारले. इतर सर्व चित्रकार मनातल्या मनात त्याच्यावर हसू लागले. त्या चित्रकाराने मात्र मग्न होऊन चित्र काढण्यास सुरुवात केली. काहीवेळाने ते चित्र तयार झाले.
ते राजासमोर सादर करण्यात आले. राजाला ते चित्र खूप आवडले. इतर चित्रकारांनीदेखील ते चित्र पाहिले आणि अवाक् झाले. त्या चित्रकाराने या चित्रात एका घोड्यावर राजा चालला असल्याचे दाखविले होते. ज्यात घोडा एका बाजूने दाखविल्याने राजाच्या नसलेल्या पायाची आणि डोळ्याची उणीव भरून निघाली आणि एक डोळा आणि एकच पाय असलेल्या राजाची व्यंगाची दुसरी बाजू मात्र झाकली गेली. परिणामी ते चित्र अधिकच खुलले. त्या चित्रकाराला त्याचे योग्य बक्षीसही मिळाले. आता या कथेत त्या वृद्ध चित्रकाराची एक बाजू जमेची ठरली आणि ती म्हणजे त्याची नजर. व्यक्तीतील व्यंग न पाहता त्याच्यातील असणाऱ्या इतर चांगल्या गोष्टी पाहिल्यानेच तो सर्वश्रेष्ठ ठरला.
अनेकदा आपण एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीबद्दल विचार करताना एकाच अंगाने करतो. त्यातही बरेचदा पूर्वानुभव किंवा पूर्वग्रहदूषितपणा हा आपल्या नजरेवर उणिवा शोधण्याचा चष्मा लावतो. त्यामुळे आपल्याला त्यातील केवळ दोषच दिसतात आणि हीच आपली नजर दोष पाहण्याची सवय अंगीकारते. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. एक चांगली तर दुसरी दोषयुक्त. आपण नेहमी वाईटातही चांगले शोधून वाईटाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
50 मुलांच्या वर्गात मुलाचा पाचवा क्रमांक आला. अशावेळी “तू पहिल्या तीनमध्ये का आला नाहीस? तुझे प्रयत्न कमी पडले, तुला ते शक्य नाही’ असे आपण त्या मुलाला सुनावतो. त्याच्यातील दोषांवर व्यक्त होतो. त्याऐवजी तू उरलेल्या 45 मुलांत पहिला आलास असे म्हणून त्याची जमेची बाजू दर्शवावी. तसेच तू असेच प्रयत्न केल्यास पहिला नंबर तुझा असेल, असे म्हणून प्रोत्साहित करावे. जीवन जगताना जगाकडे बघण्याची नजर बदलायला हवी. दृष्टिकोन बदलला तर दृश्यही बदलते. म्हणून उणिवा शोधणाऱ्या नजरेपेक्षा आशा निर्माण करणारी नजर केव्हाही फायद्याचीच.
नजर बदलो नजारे बदल जायेंगे !
कश्ती का रुख बदल के देख लो
किनारे बदल जायेंगे!
सागर ननावरे