सांगली: महापुरामुळे झालेले नुकसान मोठ्या प्रमाणात असून पूरबाधितांना या संकटाच्या काळात सर्वांच्या मदतीची गरज आहे. मदत करण्यास इच्छुक दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेवून सढळहस्ते मदत करावी. मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या मदत स्वीकृती केंद्रात आपली मदत पाठवा, असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
आज सुभाष देशमुख यांनी मदत स्वीकृती केंद्राला भेट देवून पाहणी केली. जिल्ह्यामध्ये महापुरामुळे बाधित कुटुंबे आणि जनावरे यांच्याकरिता मदत स्वीकृती केंद्र स्थापन करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील पळशी तालुक्यातून अजिंक्यतारा येथून जिल्हा नियोजन समिती साताराचे सदस्य बाळासाहेब खाडे यांच्या पुढाकारातून 11 हजार रूपयांचा धनादेश जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आला. सुभाष देशमुख व जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासनाच्या वतीने धनादेश स्वीकारला.
जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत पूरग्रस्तांना राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. या मदतीचे गरजूपर्यंत वाटप करण्यात येत आहे.
डॉ. चौधरी म्हणाले, पूरग्रस्तांसाठी जिल्हा प्रशासनाकडून अन्नधान्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वस्तु स्वरूपातील मदत या ठिकाणी स्वीकारली जाईल. मात्र पावसाळी वातावरणात खराब होणारे खाद्यपदार्थ स्वीकारण्यात येणार नाहीत, याची नोंद घ्यावी. स्वीकृत मदत विस्थापितांसाठी तयार करण्यात आलेल्या कँपमध्ये पोहोच केली जाईल. तसेच, पूर ओसरल्यानंतर बाधित गावांमध्ये पोहोचवली जाईल. शासन व प्रशासन स्तरावरील मदतीबरोबरच स्वयंसेवी संस्थांनी स्वयंस्फूर्तीने मदतीचा हात पुढे केला आहे. ही मदत एकत्रितरीत्या संकलित होऊन, गरजू लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, तळमजला, टपाल शाखेसमोर या ठिकाणी मदत स्वीकृती केंद्र सुरू करण्यात आले आहे.
इच्छुकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा पुरवठा कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली संपर्क क्रमांक 02332600512 येथे संपर्क करावा. मदत स्वीकारण्यासाठी संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे – 9307839910, शिल्पा ओसवाल, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी 8800754733/9403683238, राजश्री सानप, अव्वल कारकून 8830322740, शिवाजी पाटील, अव्वल कारकून 9850099662, श्री. मुळे, लिपिक 9421114828
याठिकाणी आतापर्यंत रायगड, पुणे, सातारा, लातूर, बीड, उस्मानाबाद या बाह्य जिल्ह्यांसह जत, कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यातूनही मदत आली आहे. या मदतीचे वाटप पलूस, वाळवा आणि मिरज तालुक्यातील पूरग्रस्तांना केले जात आहे. आवश्यक त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टँकर्सद्वारे सुरू करण्यात आली आहे.