मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याप्रकरणी एनआयएने अटक केल्यानंतर एपीआय रियाझ काझी यांना मुंबई पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले. अँटिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात काझी यांची या संपूर्ण प्रकरणात महत्वाची भूमिका असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पुरावे मिटवणे, प्रकरणाची माहिती असून देखील सहकार्य केल्याचा आरोप एनआयएने केला आहे.
एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाझ काझी यांना सचिन वाझे यांनी केलेल्या सर्व गुन्हाची माहिती होती. अँटिलिया स्फोटक प्रकरणातील तपासाचा हवाला देत काझी यांनी 26 फेब्रुवारी रोजी ठाणे येथे असलेल्या साकेत सोसायटीत जाऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज आपल्या ताब्यात घेतले होते आणि ते मिटवले होते.
17 फेब्रुवारी रोजी मनसुख हिरेनची स्कॉर्पिओ गाडी विक्रोळीहून घेतल्यानंतर ती साकेत सोसायटीत आणण्यात आली होती. हीच गोष्ट तपास यंत्रणांना लक्षात येऊ नये म्हणून तेथील सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज मिटवण्यात आले. इतकेच नाही तर पंचनामाध्येही डीव्हीआरचा उल्लेख नव्हता. साकेत सोसायटीच्या लोकांनी त्यांच्या स्थानिक पोलीस ठाण्यात ही माहिती दिली तेव्हा ही बाब उघडकीस आली.
दरम्यान, एपीआय रियाझ काझी हे 2010 साली एमपीएससीमधून भरती झाले होते. त्यांची पहिली पोस्टिंग वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये पीएसआयच्या पोस्टवर झाली. जेथे त्यांनी प्रोबेशन पीरियडवर काम केले. वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये काही वर्षे काम केल्यावर त्यांची अँटी चेन स्नॅचिंग स्कॉर्डमध्ये बदली करण्यात आली. त्यानंतर रियाझ यांना सीआययूमध्ये पाठवण्यात आले. मात्र अँटिलिया प्रकरणात नाव अल्यानंतर त्यांची सीआययूमधून बदली करण्यात आली.