मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अटकेत असलेले आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी आपल्याला राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची अनुमती द्यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. पण त्यांना जरी अनुमती मिळू शकली नाही तर आमच्या संख्याबळावर त्याचा काहीही विपरीत परिणाम होणार नाही असे कॉंग्रेसचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
त्या दोघांच्या अनुपस्थितीतही महाविकास आघाडीचे राज्यसभेचे चारही उमेदवार विजयी होतील असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.
महाविकास आघाडीकडून शिवसेना 2, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रत्येकी 1 अशा एकूण चार जागा लढवत आहे. तर भाजपकडून तीन उमेदवार उभे करण्यात आले आहेत. थोरात म्हणाले की आम्ही आमचं गणित व्यवस्थीत केले असून आम्ही ते यशस्वीपणे सोडवू.