नवी दिल्ली – पाकिस्तान लष्कराने केलेली कोणतीही आगळीक त्यांना महागात पडेल आणि त्यांना त्याबद्दल जबर किंमत मोजावी लागेल असा इशारा लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी दिला आहे. दहशतवाद्यांनाही प्रत्येक कृतीची किंमत मोजावी लागेल असेही त्यांनी म्हटले आहे.
कारगील संघर्षाच्या 20 व्या वर्षानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. ते म्हणाले की पाकिस्तान लष्कराने वेळोवेळी भारताच्या विरोधात काही तरी आगळीक करण्याचा प्रयत्न केला आहे. काही वेळा घुसखोरीच्या माध्यमातून तर काही वेळा दहशतवाद्यांना हाताशी धरून त्यांनी हे कृत्य केले आहे. पण त्यांचा डाव भारतीय लष्कराने ठामपणे उधळून लावताना भारतीय भूमिचे शौर्याने रक्षण केले आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीला चोख उत्तर दिले जाईल या विषयी कोणाचाही मनात शंका असू नये असे प्रतिपादनही त्यांनी केले.
ते म्हणाले की आता त्यांनी भारताच्या विरोधातील कारवायांचे स्वरूपही बदलले आहे. त्यांनी दहशतवादी गटांना हाताशी धरून भारतीय भूमित कारवाया सुरू केल्या आहेत. आता सायबर आणि अंतरीक्ष क्षेत्रही संघर्षाचे क्षेत्र बनू पहात आहे असे ते म्हणाले. बालकोट मधील एअर स्ट्राईक आणि सजिर्कल स्ट्राईकमुळे दहशतवादाला चोख उत्तर देण्याची आपली राजकीय आणि लष्करी दृढताही स्पष्ट झाली आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले.