नवी दिल्ली – कोरोना विषाणूच्या बाधेनंतर सौम्य स्वरूपाची लक्षणं असलेल्या रुग्णांबाबत एक महत्वपूर्ण संशोधन करण्यात आलं आहे. या संशोधनामध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणं असलेले रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीबाबत अभ्यास करण्यात आला असून प्राप्त झालेले निष्कर्ष शास्त्रज्ञांची चिंता वाढवणारे ठरलेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अँटीबॉडीबाबत करण्यात आलेल्या एका संशोधनातून असे निष्कर्ष प्राप्त झाले आहेत की, या बाधितांच्या शरीरात तयार झालेल्या कोरोनाविरोधातील अँटीबॉडी फार काळ तग धरत नाहीयेत. हे संशोधन न्यू इंग्लंड जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आल्याचं वृत्त एनडीटीव्ही या वृत्तसंकेस्थळाने दिलं आहे.
या संशोधनामध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणं असलेल्या ३४ कोरोनामुक्त रुग्णांमधील अँटीबॉडीचा अभ्यास करण्यात आला. कोरोना लक्षणं दिसल्यानंतर सरासरी ३७ दिवसांनंतर प्रथम त्यांचे नमुने घेण्यात आले होते. त्यानंतर कोरोना लक्षणं आढळून आल्याला ८६ दिवस उलटल्यानंतर दुसऱ्यांदा नमुने घेण्यात आले. दोन्ही वेळी घेतलेल्या नमुन्यांद्वारे अँटीबॉडीजचे शरीरातील प्रमाण झपाट्याने कमी झाल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला.
जगभरातील संशोधक सध्या कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरातील अँटीबॉडीजचा अभ्यास करत आहेत. आतापर्यंत झालेल्या संशोधनातून सौम्य स्वरूपाची लक्षणं असलेल्या रुग्णांमधील अँटीबॉडीजचे प्रमाण झपाट्याने कमी होत असल्याचा निष्कर्ष असून यामुळे कोरोनमुक्ताला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येतोय.
विशेष म्हणजे जगभरामध्ये कोरोना विष्णूची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. या संशोधनाद्वारे कोव्हीड-२०१९ रुग्णांमधील अँटीबॉडी घटण्याचे प्रमाण हे सार्सपेक्षा (कोरोना विषाणू संसर्गाचा पूर्वी येऊन गेलेला प्रकार) अधिक आहे असाही निष्कर्ष नोंदवण्यात आलाय.