श्रीगोंदा (शहर प्रतिनिधी) – राज्यात आलेल्या बर्ड ल्यूची श्रीगोंदा तालुक्यात एन्ट्री झाली आहे. भानगाव (ता. श्रीगोंदा) येथे कावळ्याचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाला असल्याचे अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चार दिवसांपूर्वी भानगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात दोन कावळ्यांची भांडणे झाली. त्यात दोन्ही कावळे जखमी झाले होते. एक कावळा उडून गेला, तर एक जागीच गतप्राण झाला.
ही बाब तेथील कर्मचार्यांनी वरिष्ठांना कळविली. मृत कावळ्याची रक्त तपासणी करण्यासाठी त्यास पुणे व तेथून भोपाळला पाठविण्यात आले. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, हा कावळा बर्ड फ्लूने बाधित असल्याचे समोर आले आहे.
भानगावमध्ये ज्या ठिकाणी कावळा मृतावस्थेत आढळला, त्या परिसरासह आसपास कोंबड्यांची खुराडी व पोल्ट्री फार्म तसेच जवळच्या कार्यक्षेत्रामध्ये सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात येणार आहे. त्या परिसरातील पाचशे कोंबड्यांची सद्यस्थितीतील तपासणी करण्यात आलेली आहे.
तीन गावांतून 160 कोंबड्याचे नमुने ताब्यात
या संदर्भात तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. डी. एस. गाडे म्हणाले, श्रीगोंदा, काष्टी व बेलवंडी परिसरातील 160 कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोग शाळेत पाठवले आहेत. कावळा एकाच ठिकाणी थांबत नाही, त्यामुळे परिसरातील लोकांनी घाबरुन जावू नये.