नवी दिल्ली – देशातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांमध्ये ४३५०९ नवे करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.
मंगळवारी नव्या बाधितांचा आकडा चार महिन्यांमध्ये प्रथमच तीस हजारांच्या खाली आला होता. मात्र बुधवारी देशात ४३६५४ नवे रुग्ण आढळले. हा आकडा मंगळवारपेक्षा तब्बल 47 टक्क्यांनी अधिक होता. आज देखील रुग्णसंख्या चाळीस हजारांच्यावर आढळून आली आहे.
आज जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांमध्ये ३८४६५ रुग्ण बरे झाले असून ६४० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. नव्या बधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचा आकडा कमी असल्याने ही देखील चिंतेची बाब ठरत आहे.
दरम्यान, केरळ येथे करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील एकूण रुग्णांच्या ५० टक्के रुग्ण हे केरळ महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांमध्ये आढळून येत आहेत.