पाटणा – बिहार विधानसभेची रणधुमाळी सध्या जोरदार सुरु असून, सताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना विविध तंत्र-मंत्रांचा अवलंब सुरु केला आहे. केंद्रिय मंत्री अनुराग ठाकूर यांनी नितीशकुमाराम्च्या नेतृत्त्वातील आघाडीचा प्रचार करताना 45 वर्षांपूर्वी गाजलेल्या “शोले’ चित्रपटातील डाकू गब्बर सिंगचे वाक्य वापरल्याने ते चर्चेत आले आहेत.
पाटणा येथील सभेत बोलताना ठाकूर म्हणाले की, राष्ट्रीय जनता दलाने स्थापन केलेली महागठबंधन आघाडी ही दिशाहीन आणि गोंधळलेल्या नेत्यांची आघाडी बनलेली आहे. केवळ सत्तेसाठी या आघाडीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशीही युती केलेली आहे. याचाच अर्थ या सर्व घटक पक्षांना बिहारमध्ये पुन्हा एकदा “जंगल राज’ प्रस्थापित करायचे आहे. म्हणजेच, “शोले’मधला गब्बर सिंग हा डाकू त्याची दहशत किती आहे हे सांगताना, “”सो जा बेटे; नही तो गब्बरसिंग आ जायेगा…’ हे वाक्य वापरत असायचा, तशाच प्रकारचे दहशतीचे राज्य तेजस्वी प्रसाद यादव आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना आणायचे असावे.’
ठाकूर पुढे असेही म्हणाले की, कॉंग्रेस, राजद आणि डाव्या पक्षांची ही अभद्र युती बिहारला विकासाच्या वाटेवरुन विनाशाच्या वाटेवर घेऊन जाईल. बिहारचा मतदार आता पूर्वीसारखा भोळसट राहिलेला नसून, त्यांना सत्तापिपासू राजकारणी ओळखायला यायला लागले आहेत. त्यामुळे भाजपा-जेडीयु हीच आघाडी सत्तेत येण्याचे सर्वत्र संकेत मिळत आहेत.
केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे-त्याच आघाडीचे सरकार असणे नागरिकांच्या हिताचे असते याकडे लक्ष वेधून ठाकूर म्हणाले की, गुन्हेगारांच्या राज्यापेक्षा सर्वसामान्य माणसांचे सरकारच बिहारला विकासाच्या दिशेने घेऊन जाईल.