सोशल मीडियाला कुणीही कितीही नावं ठेवत असलं तरी आज देशातील मोठ्या प्रमाणात लोकसंख्येची स्थिती अशी झाली आहे की ती या नवमाध्यमापासून दूर राहू शकत नाही. अगदी खेडोपाड्यातील नागरिकही सोशल मीडियाशी कनेक्टेड आहेत.
ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटसऍप यांसारख्या माध्यमांमुळे बॉलीवूड कलाकारांची स्थिती तर युरेका युरेका अशी झाली आहे. याचे कारण थेट चाहत्यांशी कनेक्टेड राहण्याची, कोणत्याही आडकाठीशिवाय, मध्यस्थीशिवाय, निःशुल्करित्या लोकांशी संवाद साधण्याची आणि आपल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी सोशल मीडियामुळे बी-टाऊनमधील कलाकारांना मिळाली आहे.
कदाचित म्हणूनच हे कलाकार यापासून दूर राहू शकत नाहीत. अनुराग कश्यपचेच उदाहरण घ्या ना! गेल्या वर्षी अनुरागने ट्विटर या लोकप्रिय सोशल मीडिया साईटवरुन एक्झिट घेतली होती. याचे कारण त्याला तेथे मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात होते. इतकेच नव्हे तर त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही धमक्या दिल्या जात होत्या. तथापि, गेल्या काही दिवसांपासून देशभरात एनआरसी आणि कॅबवरुन निर्माण झालेला असंतोष आणि एकंदरीतच वातावरण पाहून अनुरागने ट्विटरवर परतण्याचा निर्णय घेतला.
मागील काळात बेधडक आणि एकांगी विधानांमुळे अनुरागला सातत्याने ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आताच्या वातावरणात अनुरागची आगपाखड अधिक धारदार बनेल यात शंकाच नाही!