पुणे – करोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव थोपवण्यात आपण यशस्वी ठरलो असलो तरी धोका अद्याप टळलेला नाही. मात्र, आर्थिक चक्र सुरू राहण्यासाठी करोनासोबत आपण पुढे चालत आहोत. सध्या जवळपास पूर्णपणे लॉकडाऊन उठले गेले आहे. मार्चपासून आतापर्यंत आणि जोपर्यंत करोनाला रोखणारी लस विकसित होत नाही.
तोपर्यंत “आरोग्यम् धनसंपदा’ म्हणजेच आरोग्य हेच आपले धन या मूलमंत्राचे महत्त्व अबाधित ठेवायचे आहे. संपूर्ण लॉकडाऊनपासून ते आतापर्यंत चिंबळी फाटा (ता. खेड) येथील जैद पाटील एज्युकेशन सोसायटी, शांताई इंग्लिश मेमोरियल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष अनुराग संजय जैद आणि त्यांचे कुटुंब “नागरिकांची सुरक्षा हाच एक ध्यास’ अंगी बागळत सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचलत असल्याने परिसरात त्यांना “करोना योद्धा’ म्हणून नवीन ओळख मिळाली आहे.
“शांताई’कडूनही दिलासा…
करोनामुळे या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून शाळा-कॉलेज बंद ठेवत ऑनलाइन शिक्षण सुरू केले. अनुराग जैद अध्यक्ष असलेली शांताई स्कूल आणि कॉलेजनेही ऑनलाइन शिक्षण सुरू केले. लॉकडाऊनमुळे पालकांची आर्थिक घडी विस्कटलेली होती, त्यामुळे जैद यांनी वार्षिक शुल्कात 30 टक्के सवलतीसोबतच “फी’ भरण्यासही पालकांच्या सोयीनुसार मुदतही दिल्याने पालकवर्गाला दिलासा मिळाला होता.
ज्यावेळी सर्वच शैक्षणिक संस्थांनी “फी’चा तगादा लावला होता त्यावेळी जैद यांच्या शांताई संस्थेने मात्र सर्वच शैक्षणिक संस्थापुढे एक आदर्श उभा केला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाही खंड पडून दिला नाही, असे पालक आवर्जून सांगतात. शांताई पतसंस्थेच्या माध्यमातून लॉकडाऊनमुळे हतबल झालेल्या व्यावसायिकांना सुलभरीत्या कर्जसुविधा उपलब्ध करून त्यांना त्यांचे व्यवसाय पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी सहकार्य केले.
कडक लॉकडाऊनमध्ये 101 पिशव्या रक्तसंकलन:
करोना लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताची नितांत गरज भासू लागली होती. याचेच गांभीर्य ओळखून अनुराग जैद यांनी चिंबळी ग्रामस्थ प्रामुख्याने युवा वर्गाच्या सहकार्याने कडक लॉकडाऊनमध्ये एका दिवसात सर्वाधिक असे रेकॉर्डब्रेक 101 पिशव्या रक्तसंकलन करून अनेकांचे प्राण वाचविण्यात मोलाचा वाटा उचलत समाजाला दिशा देण्याचाही केलेला प्रयत्न वाखाणण्याजोगे आहे.
अनुराग जैद-पाटील यांचे वडील संजय दगडू जैद-पाटील हे शांताई पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून याच पतसंस्थेत संचालक म्हणून अनुराग जैद-पाटील काम पाहात आहेत. तसा सामाजिक कार्याचा वसा अनुराग यांनी वडील संजय जैद-पाटील यांच्याकडून घेतला आहे. जैद-पाटील हे संपूर्ण कुटुंबच सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. संपूर्ण कडक लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना मदतीचा हात देण्यात हे कुटुंब सर्वांत आघाडीवर होते. पुणे शहरात पहिला करोनाबाधित रुग्ण मार्च महिन्यात आढळला.
त्यानंतर हळूहळू त्याचा प्रादुर्भाव संपूर्ण जिल्ह्यात झाला. त्यामुळे औद्योगिक वसाहत असलेली चाकण औद्योगिक वसाहतही या काळात संपूर्ण लॉकडाऊन होती. या वसाहतीत स्थानिकांसोबतच हजारो परप्रांतीय मजूर रोजंदारीवर काम करतात. मात्र, लॉकडाऊनमध्ये सगळ्याच कंपन्या बंद असल्याने स्थानिकांसह परप्रांतीय मजुरांचा रोजगारच हिरावला गेला होता. त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याचे हाल होत होते. त्यात घराबाहेर पडता येत नसल्याने कोणाकडे मागूही शकत नव्हते. ही बाब जैद-पाटील कुटुंबाला मिळाली अन् त्यांनी क्षणाचाही विलंब न करता चिंबळी परिसरात राहणाऱ्या मजुरांचा शोध घेत त्यांना दोनवेळच्या जेवणाची सोय केली.
त्याचबरोबर करोनाला दूर ठेवण्यासाठी तोंडाला मास्क लावणे गरजेचे आहे, वेळोवेळी साबणाने हात धुणे, बाहेर असेल तर सॅनिटायझर वापरणे गरजेचे असल्याचे शासन आणि डॉक्टरांनी जाहीर केले. मात्र, हे खरेदी करण्यासाठी या मजुरांसोबतच स्थानिक पातळीवरील गरीब कुटुंबांना शक्य नव्हते म्हणून अनुराग यांनी स्वखर्चाने मास्क, सॅनिटायझर, साबण खरेदी करून गरजू आणि गरीब कुटुंबांना, व्यक्तींपर्यंत पोहोचवून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडण्याची मोलाची भूमिका तेव्हाही बजावली आणि आताही बजावत आहेत.
लॉकडाऊनच्या काळात पैसे नसल्याने परप्रांतीय आणि परजिल्ह्यातील मजूर पायपीट करीत घराचा मार्ग धरला होता. याकाळात बाहेरगावच्या मजूर आणि गरजूंना घरी जाण्यासाठी शासनाने काही बसेस आणि रेल्वे सोडल्या होत्या. मात्र, लॉकडाऊन असल्याने रस्त्यावर वाहनेही धावत नव्हती अशावेळी रेल्वेस्टेशन आणि बसेस ज्या ठिकाणाहून सोडणार आहेत त्या ठिकाणी कसे पोहोचायचे असा प्रश्न या मजुरांसमवेत त्यांच्या कुटुंबाला पडला होता. अशावेळीही अनुराग यांनी धाव घेत स्कूलच्या बसेस या मजुरांसह त्यांच्या कुटुंबांना इच्छित स्थळी सोडण्यासाठी निशुल्क उपलब्ध करून दिल्या. त्याचबरोबर त्यांना दोन दिवस पुरेल इतका खाण्या-पिण्याचे साहित्यही पुरवले. त्याचबरोबर स्थानिक गोरगरिबांना महिन्याभराचा किराणाही देण्याचे काम त्याकाळात अनुराग जैद-पाटील यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबांने करून सामाजिक जाणीव राखली. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे ते थोडेच आहे.
शब्दांकन – सुनील बटवाल चिंबळी
करोनाना महामारीच्या काळात गरजू आणि गरीब लोकांना अनुराग जैद-पाटील आणि जैद-पाटील कुटुंबाने मदत केली. या मदतरूपी मिळालेले आशीर्वादच आमच्या कुटुंबाची पुंजी आहे. गरजवंतांकडून मिळालेले आशीर्वाद सामाजिक कार्यात आणखी प्रोत्साहन देत असून त्यादृष्टीने अनुराग यांची वाटचाल सुरू आहे ती उत्तरोत्तर बहरत जावो हीच इच्छा.
– संजय दगडू जैद-पाटील,
संस्थापक अध्यक्ष, शांताई पतसंस्था