नवी दिल्ली ( anupam kher ccriticizes modi government ) – देशापुढे करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचे मोठे संकट उभे राहिले आहे. दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येची धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत असून यामुळे आरोग्यव्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे.
अनेक ठिकाणी उपचारांअभावी रुग्ण दगावल्याच्या हृदयद्रावक घटना समोर येतायेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून करोना बाधेमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह नद्यांमध्ये वाहून आल्याच्या घटना उत्तर प्रदेश, बिहार व मध्यप्रदेशात उघडकीस आल्या आहेत. यावरून आता केंद्र सरकारवर चौफेर टीका सुरु झाली आहे.
टीकाकारांच्या यादीमध्ये आता मोदी सरकारचे खंदे समर्थक मानल्या जाणाऱ्या अनुपम खेर ( anupam kher ccriticizes modi government ) यांचाही समावेश झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अनुपम खेर यांना सरकारची प्रतिमा निर्मिती करण्याचा प्रयत्न आणि नद्यांमध्ये करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची प्रेत आढळून आल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.
या प्रश्नाचे उत्तर देताना अनुपम खेर यांनी, “या प्रकरणात सरकारवर जी टीका होतेय ती वैध आहे. या परिस्थितीत सरकारने ते काम करावं ज्यासाठी त्यांना निवडून दिलं आहे. देशात आज जी काही परिस्थिती आहे त्यावर कोणालाही वेदना होऊ शकतात. देशातील नद्यांमध्ये तरंगणारी प्रेतं यावरुन कोणत्याही राजकीय पक्षाने राजकारण करण्याची ही वेळ नाही.
आपण देशातील एक जबाबदार नागरिक या नात्याने सरकारला जाब विचारला पाहिजे, आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत. सरकार कुठे न कुठे कमी पडलं असून स्वत:ची प्रतिमा निर्मिती करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणं हे महत्वाचं आहे” अशी अनपेक्षित भूमिका मांडली.
अनुपम खेर यांचे भाजप कनेक्शन
समाज माध्यमांद्वारे सतत मोदी सरकारची पाठराखण करण्यासाठी अनुपम खेर ओळखले जातात. काही दिवसांपूर्वीच त्यांचे, ‘आयेगा तो मोदीही’ हे ट्विट विशेष गाजले होते. अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर या भाजपच्या खासदार आहेत. अशातच अनुपम खेर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ( anupam kher ccriticizes modi government ) आता अनेकांच्या कपाळावर आठ्या पडल्या आहेत.