मथुरा: “ओम’ किंवा “गायी’बद्दल बोलणे हे मागासपणाचे लक्षण मानणाऱ्या लोकांनी देशाचे नुकसान करण्याचा निश्चयच केला आहे, अशा शब्दामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीकाकारांचा समाचार घेतला. राष्ट्रीय पशुधन संवर्धनासाठीच्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
“आफ्रिकेतील रवांडा देशामध्ये सरकारकडून गावांना गायी भेट दिल्या जातात. मात्र त्या गायीला होणारी पहिली कालवड सरकारकडे जमा केली जाते. ही कालवड ज्या गावांमध्ये गाय नाही, त्या गावांना दिली जाते. प्रत्येक घरामध्ये गाय असायला हवी, यासाठी हा उपक्रम राबवला जातो.’ असे मोदी म्हणाले.
मात्र आपल्या देशामध्ये कानावर “ओम’ असा शब्द पडल्यावर काही लोकांचे कान उभे राहतात. गायीबद्दल बोलल्यावरही या लोकांना त्रास होतो, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. असे लोक देशाचे नुकसान करण्यासाठीच तत्पर असतात, असेही मोदी म्हणाले.