आदोलनाची धग ईशान्येत कायम, प. बंगालमध्येही जाळपोळीच्या घटना
नवी दिल्ली/गुवाहाटी/कोलकाता : राष्ट्रीयत्व सुधारण कायद्यामुळे देशात वादळ उठले आहे. आसाम, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात हिंसाचार उफाळला असून या कायद्याच्या विरोधात पडसाद देशाची राजधानी दिल्लीतही उमटले आहेत.
आसाममध्ये सोनितपूर येथे तेलाचा टॅंकर पेटवून देण्यात आला. त्यात त्याच्या चालकाचा मृत्यू झाला. हा रिकामा टॅंकर सिपाजहर येथे भरण्यासाठी जात होता, त्यावेळी ढेकीयाजुली येथे संतप्त जमावाने तो पेटवून दिला. या चालाकाला भाजलेल्या अवस्थेत खासगी रूग्णालयात उपचारासाठी शनिवारी सकाळी दाखल करण्यात आले. त्यावेळी उपचारा दरम्यान त्याचा मत्यू झाला. आसूसह 30 संघटनांनी ब्रम्हपुत्रा नदीच्या खोऱ्यातील प्रदेशात आपल्या निदर्शनाची तीव्रता वाढवली आहे.
या संघटनांनी गानाआंशन (सामुहिक उपोषणाचे) अस्त्र बाहेर काढले आहे. त्यानुसार 16 तारखेला सकाळी सहा वाजल्यापासून 36 तासांचे उपोषण सुरू करण्यात येईल. 18 तारखेपासीन ग्रामसभा घेऊन त्यात या कायद्याविरोधात आंदोलन करण्यात येईल. 24 डिसेंबरला प्रचंड मोर्चा काढण्यात येणार आहे.
कोणत्याही स्थितीत हिंसाचार सहन केला जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देऊनही प. बंगालमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हिंसाचार सुरूच राहीला. मुर्शिदाबाद, उत्तर 24 परगाणा जिल्हा, ग्रामीण हावडा जिल्हा येथे हिंसाचाराच्या घटना घडल्या. संतप्त निदर्शकांनी सुमारे 15 बसेस पेटवून दिल्या. राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 आणि 2 ला जोडणारा आर्तेरीयल कोना जलदगती मार्ग रोखून धरला. अनेक ठिकाणी टायर्स पेटवण्यात आली. काही वाहनांचे नुकसान करण्यात आले.
दिल्लीत जंतरमंतर येथे शेकडो जण जमा झाले. त्यांनी या कायद्याच्या निषेधार्त घोषणा दिल्या. जनपथ मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आले होते.