केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन
पुणे – लोकमान्य टिळकांनी शंभर वर्षांपूर्वी मांडलेले विचार आजही कालातीत असून, सध्याच्या परिस्थितीतील विविध प्रश्नांची उत्तरे टिळकांच्या विचारात आहेत. नव्या पिढीने या दूरदृष्टी असलेल्या व्यक्तिचरित्राचा अभ्यास करून भविष्यात वाटचाल करावी, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज येथे केले.
लोकमान्य टिळक स्मृतिशताब्दी वर्षदिनानिमित्त भारतीय सांस्कृतिक परिषद आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित केलेल्या “लोकमान्य टिळक-स्वराज्य ते आत्मनिर्भर भारत’ या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय वेबिनारचे उद्घाटन करताना शहा बोलत होते. यावेळी दिल्लीतून खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे आणि पुण्यातून डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, टिळक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक, आमदार मुक्ता टिळक, साहित्यिक डॉ. सदानंद मोरे उपस्थित होते.
शहा म्हणाले की, उत्तम वक्ता, राजकारणी, व्यासंगी, पत्रकार असे अनेक गुणसंपन्न व्यक्तिमत्त्व असलेले लोकमान्य टिळक यांनी जमिनीशी नाळ तुटू दिली नाही. दूरदृष्टी आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या लोकमांन्यांचे चरित्र नवीन पिढीने वाचावे, भविष्यात येणाऱ्या अडचणी नक्कीच दूर होतील, भारत आत्मनिर्भर बनेल आणि हीच खरी लोकमान्य टिळकांना श्रद्धांजली ठरेल.
दरम्यान, स्वदेशीचा नारा देणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या अभिप्रेरणेनुसार देश सध्या आत्मनिर्भरतेनुसार वाटचाल करत असल्याचे डॉ. सहस्रबुद्धे यांनी सांगितले. तसेच देशातील समाज एकसंधतेसाठी स्वभाषा आणि स्वभूषा आत्मसात करावी. त्यासाठी प्रत्येकाने आपल्यातील स्वः ओळखावा, त्यानंतर आत्मपरिचय करून वाटचाल करावी, असे डॉ. सहस्रबुद्धे यांनी सांगितले.
डॉ. टिळक म्हणाले की, आत्मनिर्भर भारत, मॉडर्न इंडिया, स्वदेशी, स्वराज्य या संकल्पना लोकमान्यांनी त्या काळात मांडल्या. परंतु, त्यांच्या पश्चात शंभर वर्षांनंतर भारत त्यांचे विचार घेऊन वाटचाल करत आहे. प्रास्ताविक डॉ. शरद कुंटे यांनी केले.
… तो पर्यंत “सिंहगर्जना’ राहील
लोकमान्य टिळकांच्या प्रवेशानंतर स्वातंत्र्यलढ्याची व्याप्ती वाढली. देशाची अखंडता, संस्कृती, परंपरा, भाषा यावर खरा राष्ट्रवाद अवलंबून असतो. या त्यांच्या विचारांनी स्वातंत्र्यचळवळीला खऱ्या अर्थाने भारतीयत्व प्राप्त झाले. एवढेच नव्हे तर जोपर्यंत देशाची स्वातंत्र्यता, अखंडता अबाधित राहील तोपर्यंत टिळकांची “स्वराज्य हा माझा ज्न्मसिद्ध हक्क आहे…’ या सिंहगर्जनेचे शब्द चिरंजीव राहतील, असे गौरवोद्गार शहा यांनी काढले.