जिद्द बाळगली की कुणालाही काहीही अशक्य नाही, याची प्रचिती “स्नेह इंडस्ट्रीज’च्या अमोल चौधरी यांना भेटल्यावर येते. व्यावसायिक भरभराट करताना ना त्यांचा पोलिओ आड आला ना त्यांचे फक्त दहावीपर्यंतचे शिक्षण! सकारात्मकतेने एकेक पाऊल टाकलं तर यशाला पाठलाग करण्याशिवाय पर्याय उरत नाही. हेच तर त्यांनी दाखवून दिलं आहे.
काहीतरी करण्याची जिद्द आणि त्यातून विधायक काम करण्याची इच्छा बाळगली की एखादा माणूस कुठपर्यंत पोहोचू शकतो, याचं उदाहरण म्हणजे स्नेह इंडस्ट्रिजचे अमोल सुरेश चौधरी. त्यांचं आयुष्य म्हणजे केवळ संघर्ष आणि संघर्षच! पण समोर आलेल्या संघर्षाला तोंड द्यायचं, हे एकदा मनानं ठरवलं की अर्धा संघर्ष तिथंच संपतो. अमोल दीड वर्षाचे असताना त्यांना पोलिओ झाला आणि पाठोपाठ त्यांच्या आयुष्यात संघर्षानंही जन्म घेतला. अमोल हे खेड तालुक्यातल्या गोलेगावचे. याच गावात त्यांनी दुसरीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर निगडीच्या अपंग महाविद्यालयात त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं. मात्र या शाळेत दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीच वसतिगृह असल्यामुळं पुढचं शिक्षण घेता आलं नाही.
शिक्षणाची आस होती, पण शिक्षण घेता येत नव्हतं. त्यांचं कुटुंब शेतीवर अवलंबून होतं. आई-वडील, एक भाऊ आणि तीन बहिणी असा मोठा परिवार. परिस्थिती हालाखीची. काही काम करूया म्हणून गावातल्या शाळेसमोर एक छोटी टपरी टाकली. गोळ्या-बिस्किटं ते विकू लागले. पण खरेदीही निघत नव्हती. मग कसेबसे दहा हजार रुपये जमवून 2001 मध्ये गावातला पहिला एसटीडी बूथ सुरू केला. तेव्हा कॉइन बॉक्स नुकतेच आले होते. दोन-तीन वर्षं हा व्यवसाय चांगला चालला. मिळालेल्या पैशातून घरीही हातभार लागला. इतके दिवस ते दुसऱ्याच्या घरात राहात होते. या व्यवसायामुळं त्यांनी गावातच छोटं घर बांधलं. हा व्यवसाय करतानाच त्यांना व्यवसायातलं मोल कळलं. त्यांच्यातला व्यावसायिक इथंच जन्माला आला. पुढच्या प्रवासाबद्दल त्यांना विचारलं असता ते म्हणाले, “काहीतरी वेगळा व्यवसाय करण्याच्या उद्देशानं मी आळंदीच्या एमआयटी कॉलेजसमोर स्टेशनरी दुकान 2004 मध्ये सुरू केलं. पण त्यात म्हणावं तसं यश आलं नाही. त्यात दीड-दोन लाखांचं नुकसान झालं. पण तरीही खचलो नाही. मरकळ खिंडीत पुन्हा एसटीडी बूथ आणि जनरल स्टोअरचं दुकान सुरू केलं. त्यात यश मिळालं. एमआयडीसी परिसर असल्यामुळं इथं बऱ्यापैकी व्यावसायिक यश मिळालं. पण तरीही आणखी वेगळं काही करावं, असं वाटत होतं. त्यावेळी माल आणण्यासाठी मी पिंपरीला जायचो. वाटेत फूटपाथची बरीच कामं सुरू असायची. त्यात पेव्हिंग ब्लॉक वापरलं जायचं. वाटलं, हे पेव्हिंग ब्लॉक बनवण्याचा व्यवसाय सुरू केला तर? एखादा प्रश्न पडला तर त्याचा शोध घेत मुळापर्यंत जायचं, ही माझी सवय इथं उपयोगी पडली. हा व्यवसाय कसा सुरू करायचा, भांडवल किती लागेल, मशिनरी कुठं मिळेल या सगळ्याची उत्तरं मिळाली. पण उत्तरं मिळून मी स्वस्थ बसलो नाही तर 2008 मध्ये मरकळ एमआयडीसीमध्ये दहा गुंठे भाड्यानं जागा घेऊन पेव्हिंग ब्लॉक आणि सिमेंट प्रॉडक्ट्सचा व्यवसाय सुरू केला.’
व्यवसाय यशस्वी करण्यासाठी भांडवल नाही तर वेगळे निर्णय घेण्याची क्षमता असावी लागते, असं म्हटलं जातं. नेमका हाच गुण अमोल चौधरी यांच्यात आहे. सिमेंट प्रॉडक्ट्सच्या व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी या व्यवसायात पदार्पण केलं. गुजरातला जाऊन मशिनरी विकत घेऊन स्नेह इंडस्ट्रिजचा पाया रचला. हा व्यवसाय सुरू करून त्यांनी स्वतःपुढंच मोठं आव्हान उभं केलं होतं. यात वापरल्या जाणाऱ्या मटेरिअलला काय म्हणतात, इथपासून त्यांची सुरुवात होती. पण त्यांनी हार मानली नाही. ऑर्डर मिळत नव्हत्या. माल पडून राहायचा. कधी ऑर्डर आली तर ती पूर्ण करण्यासाठी भांडवल उभं करावं लागायचं.. अशा कित्येक अडचणी सुरुवातीला आल्या. पण त्यावर त्यांनी मात केली. खरंतर या व्यवसायात कित्येक जण तेव्हा होते. पण तरीही त्यांनी बाजी मारली कारण त्यांनी नेहमी नवे बदल आत्मसात केले. पेव्हिंग ब्लॉक बनवण्यामध्ये पाणी न मारता कॉंक्रिट क्युअर करण्याचं तंत्रज्ञान पहिल्यांदा महाराष्ट्रात आणलं. आजवरचा त्यांचा प्रवास पाहिला तर असे कितीतरी बेंचमार्क सांगता येतील. या प्रवासात जसं यश मिळालं तसंच अपयशही आलं. पण कायम सकारात्मक राहायचं, हे त्यांच्या यशाचं सूत्र आहे. हे यश मिळवताना, त्यांची शारीरिक मर्यादा कुठंही आड आली नाही. त्यांच्या यशाचं सूत्र सांगताना ते नेहमी म्हणतात, “समाजाच्या दृष्टीने मी अपंग आहे; मात्र मला मी कधीही अपंग समजत नाही. मला कुणी सहानुभूती दिलेलंही मला अजिबात आवडत नाही. उलट समाजाला काही करून दाखवायचंच, हेच ध्येय मी उराशी बाळगलं. हेच मी ठरवलं होतं.’
मराठी माणूस उद्योग करू शकत नाही, या वाक्यालाच त्यांनी छेद दिला आहे. आज त्यांच्या स्नेह इंडस्ट्रिजच्या माध्यमातून 300 लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. दिवसाला 1 लाख नग पेव्हिंग ब्लॉक तयार होत आहेत. 2025 पर्यंत ही क्षमता रोज 10 लाख नग इथपर्यंत त्यांना न्यायची आहे. त्यादृष्टीनं त्यांची वाटचाल सुरूही झाली आहे. स्नेह इंडस्ट्रिजच्या अमोल सुरेश चौधरी यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांची वाटचाल खडतर आहे. पण तो सुकर होऊ शकला तो केवळ त्यांनी त्यांच्या शारीरिक कमतरतेवर आधी मनाने आणि नंतर कृतीने मात केल्यामुळंच!
कोणतंही व्यावसायिक पाठबळ नसताना अमोल चौधरी आणि प्रवीण चौधरी यांनी केलेला व्यावसायिक प्रवास प्रेरणा देणारा आहे. आपली प्रगती झाली तशी आपल्या सोबत काम करणाऱ्यांचीही व्हायला हवी, त्यांनीसुद्धा मोठं झालं पाहिजे, या भावनेनं चौधरी बंधू त्यांचा व्यवसाय पुढं नेत आहेत.
सामाजिक काम :
- गोलेगावात वृक्षारोपण आणि झाडांचे संगोपन
- गावातल्या शाळेत “ई-लर्निंग’ची सुविधा
- माऊली मंदिरात अन्नदान
- शुद्ध पाण्यासाठी मरकळ, गोलेगाव शाळेत आरो प्लांट बसविले.
- यांसह अनेक क्षेत्रात भरभरून मदत.
व्यवसायाचं नेटवर्क: - पुणे, औरंगाबाद, सोलापूर या तीन ठिकाणी कंपनीची स्वतंत्र युनिट
- स्नेह इंडस्ट्रिजची प्रॉडक्ट महाराष्ट्रभर प लवकरच अन्य राज्यातही युनिट्स
अमोल चौधरी यांच्या प्रवासातून काय शिकाल?
- कायम सकारात्मक विचार करावा.
- काळाप्रमाणे उद्योगात आणि स्वतःतही बदल करावा
- स्वतःला कधीही कमी समजू नका.
- मोठं ध्येय डोळ्यासमोर ठेवा.
स्नेह इंडस्ट्रिजचे महत्त्वाचे ग्राहक:
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका । पेट्रोलियम कंपन्या । नामवंत बांधकाम व्यावसायिक
। पुण्यातल्या इंडस्ट्रिअल कंपन्या । जेएनपीटी । भारतीय रेल्वे
आई-वडिलांचे प्रामाणिक कष्ट
आई ताराबाई आणि वडील सुरेश या दोघांनी आयुष्यात खूप प्रामाणिकपणे कष्ट केले. आजही वाईट विचार मनात येतात तेव्हा त्यांचे ते प्रामाणिक कष्ट आठवतात. आजही कुठं चुकलो तर ते कान धरतात.
माझा भाऊ: माझे सर्वस्व
प्रवीण चौधरी हा माझा मोठा भाऊ. अत्यंत हुशार. इंजिनिअर व्हायचं हे त्यांचं स्वप्न. पण परिस्थिती अभावी ते अपूर्ण राहील असं वाटत असतानाच अनेक माध्यमातून त्यांनी फी साठी पैसे जमा करून खडतर परिस्थितीत इंजिनिअरिंग पूर्ण केलं. काही काळ प्राध्यापक म्हणून काम केलं. मग टाटा हनिवेल कंपनीत चांगली नोकरी मिळाली. 2010 मध्ये स्वतःचा व्यवसाय करायचा म्हणून नोकरी सोडून “व्हर्च्युओसो ऑटोमेशन सोल्युशन’ या कंपनीची स्थापना करून त्यांनी त्यावेळी मोठी रिस्क घेतली. पाच लोकांमध्ये सुरू केलेल्या या कंपनीत 350 इंजिनिअर्स काम करत आहेत. माझ्याप्रमाणेच माझ्या भावाचाही प्रवास मोठा रंजक आहे. त्याचा हा प्रवास मला नेहमीच प्रेरणा देतो. सतत काही नवं करायचं हाच विचार आम्ही करत असतो. माझा भाऊ हेच माझं सर्वस्व आहे.
– अमोल चौधरी
(संकलन: एम डी पाखरे)