-1.7 लाख कोटींच्या सवलती अगोदरच
-12 कोटी 20 लाख रोजगारावर परिणाम
– लघु उद्योगाच्या कर्जासाठी सरकार देणार हमी
– परदेशी गुंतवणूकदारांना मिळणार टॅक्स हॉलिडे
मुंबई: गेल्या पंधरवड्यात अर्थ आणि वाणिज्य मंत्रालयाने इतर मंत्रालयाशी चर्चा केली आहे. त्या आधारावर पुढील एक-दोन दिवसांत अर्थमंत्रालय उद्योगांना 3 लाख कोटी रुपयांच्या सवलती जाहीर करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विविध मंत्रालये आपल्या मंत्रालयासंबंधात काही सवलती जाहीर करू शकतात.
अमेरिका आणि इतर विकसित देशांनी राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या प्रमाणात सवलती जाहीर केल्या आहेत त्याच्याशी सुसंगत या सवलती असतील. गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारने यावर्षी 7.8 लाख कोटी रुपयाऐवजी 12 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचे ठरविले आहे. उद्दिष्टापेक्षा जास्त असलेली ही रक्कम सवलतीसाठी उपयोगात आणली जाणार असल्याचे समजले जात आहे. 15 दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने 1.7 लाख कोटीच्या सवलती गोरगरिबांसाठी जाहीर केल्या आहेत. त्यातून गरिबांना अतिरिक्त रेशन, गरीब महिलासाठी 3 महिने 500 रुपये आणि इतर बाबींचा समावेश आहे.
विविध वृत्त माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार लघुउद्योगांना कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर बाबीसाठी अतिरिक्त कर्जाकरिता हमी देण्याची शक्यता आहे. मोठ्या कंपन्यांना कर्मचाऱ्यांचे पगार देऊन त्यांना टिकविणे अवघड झाले आहे. या अनुषंगाने काही मदत जाहीर होण्याची शक्यता आहे. लाभार्थींच्या खात्यात पाठविण्याच्या थेट रकमेसाठी काही तरतूद केली जाणार आहे. ग्रामीण भागातील रोजगाराला चालना देण्यासाठी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतील वाढीव कामासाठी तरतूद वाढविण्याची शक्यता आहे. पंतप्रधान किसान मदत योजनेसाठी निधी राखून ठेवला जाणार आहे.
ग्रीन, ऑरेंज झोनमधील कामकाज वाढविण्याची रूपरेषा जाहीर केली जाईल. विमानसेवा, पर्यटन, हॉटेल क्षेत्रावर मोठा परिणाम झालेला आहे. त्यांच्यासाठी एखादी विशेष योजना जाहीर केली जाईल. बिगर बॅंकिंग वित्तीय क्षेत्र बळकट करण्यासाठी उपाययोजना जाहीर केल्या जाणार आहेत. त्यामुळे कर्जपुरवठा वाढण्यास मदत होईल.
चीनमधून येणाऱ्या उद्योगांना विविध सवलती दिल्या जाण्याची शक्यता आहे. प्राप्त माहितीनुसार 500 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना दहा वर्ष टॅक्स हॉलिडे दिला जाणार आहे. याअंतर्गत औषधी, वैद्यकीय उपकरणे, भांडवली वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी क्षेत्रातील उद्योग आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. दुसऱ्या पॅकेजनुसार अधिक कामगार लागणाऱ्या क्षेत्रात 100 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केल्यास अशा उद्योगांना 4 वर्ष टॅक्स हॉलिडे दिला जाणार आहे.
त्यामध्ये कापड, कातडी, पादत्राणे इत्यादी उद्योगांचा समावेश आहे. परदेशातून येणाऱ्या उद्योगांना जमीन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यांनी 1 जून नंतर 3 वर्षाच्या आत आपला उद्योग सुरू करणे अपेक्षित आहे. भारतामध्ये प्रदीर्घ लॉकडाऊननंतर विविध क्षेत्रातील 12 कोटी 20 लाख रोजगार कमी झाले आहेत. ही झिज भरून काढण्यासाठी या सवलतीचा उपयोग होईल असे सरकारला वाटते.