मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने सलग तिसऱ्या वेळा रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केली आहे. मात्र, तरीही अर्थव्यवस्थेत मरगळ आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात काही तरतुदी केल्या जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आगामी काळातही व्याजदर कपातीचा समावेश असलेले पतधोरण जाहीर करण्याचे संकेत रिझर्व्ह बॅंकेने दिले आहेत, असे नोमुरा या आर्थिक विश्लेषण करणाऱ्या संस्थेला वाटते.
रिझर्व्ह बॅंकेच्या सध्याच्या धोरणाबाबत काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, रिझर्व्ह बॅंकेने आगामी काळातही पतधोरण शिथिल ठेवण्याचे संकेत दिलेले आहेत. त्यामुळे पाऊस चांगला पडला तर ऑगस्ट महिन्यातील पतधोरणातही बॅंक व्याजदरात कपात करू शकते. याला पतधोरण समितीचे सर्व सदस्य मान्यता देतील असे या संस्थेने म्हटले आहे.
जास्त व्याजदर कपात करण्याच्या शक्यतेवर विचार करण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी पाव टक्का कपात जाहीर करण्यात आली होती. महागाई बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. त्याचबरोबर पाऊस चांगला पडल्यानंतर ती वाढण्याची शक्यता कमी आहे.