बंगळुरू – अकरा आमदारांच्या राजीनाम्यानंतर अडचणीत आलेल्या कॉंग्रेस-जेडीएस आघाडी सरकारच्या अडचणी अजून संपताना दिसत नाहीत. आज या सरकार मधील एक मंत्री व बिदर उत्तरचे आमदार रहीम मेहमुद खान यांनीही सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत राजीनाम्याचा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांच्याशी चर्चा करून आपण आपला निर्णय घोषित करू.
त्यांनी म्हटले आहे की माझ्याकडे क्रिडा आणि युवक कल्याण खाते देण्यात आले असून माझ्या खात्यासाठी केवळ पंधरा कोटी रूपयांच्या निधीची तरतूद सरकारने केली आहे. यातील तेरा कोटी रूपये मागील बिले देण्यासाठी गेले असून उर्वरीत दोन कोटी रूपयांमध्ये मी माझ्या खात्याचा कारभार कसा सांभाळायचा असा सवाल करीत त्यांनी राज्यातील सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.