नवी दिल्ली – यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे पश्चिम बंगालमध्ये विशेष लक्ष घालण्यात आले होते. भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये सभांचा धडाकाच लावला होता. निवडणूक प्रचार सभांमध्ये मोदी शहांकडून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर सडकून टीका देखील करण्यात आली होती. मोदी शहांच्या या राजकीय खेळीने पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपला लोकसभेच्या 18 जागा मिळाल्या आहेत.
अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी उद्या राष्ट्रपती भवनात होणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याचे पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचारात बळी गेलेल्या 50हून अधिक भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना विशेष निमंत्रण दिले आहे. मोदी-शहांचा हा निर्णय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दिलेला कठोर राजकीय संदेश मानला जात आहे. तत्पूर्वी काल पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या 60 नगरसेवकांनी आणि 2 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.