नागपुर: नागपुर जिल्ह्यात आणखी एका कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. महादेव रघुनाथ रानडे असे या शेतकऱ्याचे नाव असून ते 48 वर्षीय आहेत.
कर्ज फेडणे शक्य होत नसल्याने निराश होऊन त्यांनी घरातील पंख्याला गळफास लाऊन आत्महत्या केली. हा प्रकार नागपुर जिल्ह्यातील धापेवाडा खुर्द येथे घडला. त्यांनी गळफास लाऊन घेतला त्यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगा शेतात कामाला गेले होते.
आत्महत्येपुर्वी त्यांनी एक चिठठी लिहून ठेवलेली आढळून आली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की गेल्या वर्षी पडलेल्या रोगामुळे आपले कापसाचे पिक मोठ्या प्रमाणावर वाया गेले.
या पिकासाठी त्यांनी आपल्या मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून एक लाख रूपयांचे कर्ज घेतले होते ते कर्ज आता फेडता येणे शक्य नसल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. असे त्यांनी या चिठ्ठीत लिहीले आहे. रानडे यांचे या गावात चार एकर शेत आहे. त्याच्यावरच त्यांची गुजराण चालू आहे.