इस्लामाबाद – पाकिस्तानने भारताचे आणखी शंभर मच्छिमार कारागृहातून सोडले. या महिन्यात चार टप्प्यांमध्ये 360 भारतीय मच्छिमारांची सुटका करण्याची घोषणा पाकिस्तानने केली होती त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात त्यांनी हे शंभर मच्छिमार सोडले आहेत. गेल्या 7 एप्रिल रोजी त्यांनी शंभर मच्छिमारांची पहिली तुकडी कारागृहातून सोडली होती. शनिवारी सोडण्यात आलेल्या मच्छिमारांना रेल्वेमार्गे लाहोरला नेण्यात आले तेथून वाघा बॉर्डर परिसरात त्यांना भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. येत्या 29 एप्रिल पर्यंत बाकीचे कैदी सोडण्यात येणार आहेत असे पाकिस्तानने जाहीर केले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात निश्चीत अशी सागरी हद्द नाही त्यामुळे एकेमकांच्या हद्दीत बेकायदेशीर मासेमारी केल्याच्या आरोपावरून दोन्ही देश एकमेकांच्या मच्छिमारांना पकडत असतात.