नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाच्या घटनेनंतर दिल्लीच्या सीमांवरील ढिले पडत गेलेले शेतकरी आंदोलन पुन्हा चांगलेच बहरले असून शेजारच्या राज्यांमधून शेतकऱ्यांचे जत्थे आंदोलन स्थळी येण्याचे प्रमाण आजही मोठे होते.
त्यामुळे आंदोलन स्थळी पुर्वी पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा जमाव जमला असल्याचे दिसून आले आहे. सिंघु, टिकरी, आणि गाजीपुर या तिन्ही स्थळी हा जमाव वाढला आहे. जय जवान, जय किसान, किसान एकता जिंदाबादचे नारे ठिकठिकाणी घुमत आहेत.
हरियातानील 17 जिल्हे आणि आंदोलन स्थळावरील इंटरनेट सेवा पुर्ण विकस्कळीत झाली असून ती पुर्ववत करण्यात यावी अशी मागणी किसान नेत्यांनी सरकारकडे केली आहे. देशातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला असून त्यासाठी 16 राजकीय पक्षांच्या सदस्यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला होता.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलकांशी पुन्हा चर्चा करण्याची तयारी दर्शवल्याने दोन्ही बाजूंकडून थंडावलेली चर्चेची प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.