नवी दिल्ली – मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात आज 20 व्या दिवशीही लढा सुरूच आहे. मात्र केंद्र सरकार केवळ शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचीच भाषा करीत असून अंतिम काहीही निर्णय घेण्यास तयार नसल्याचे चित्र आजही तसेच दिसत आहे.
दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत हजारोंच्या संख्येने शेतकरी आंदोलनाचा गड लढत आहेत. या आंदोलनात तरुण शेतकरी, महिला आणि वृद्ध शेतकऱ्यांचाही समारवेश आहे. नुकतेच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आंदोलनादरम्यान झालेल्या मृतांच्या आकडेवारीकडे लक्ष वेधले होते. मात्र, या मुद्द्यावरूनही सरकारने दुर्लक्ष केले.
काल एका 42 वर्षीय शेतकऱ्याचा हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. मक्खन खान असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
आजही या आंदोलनातील एका वृद्ध शेतकऱ्याने दम तोडला आहे. सलग 20 दिवस ते कृषी कायद्याविरोधात लढत होते.
कुंडली सीमेवर आज दुपारी 12 च्या सुमारास एका 74 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याच्या छातीत दुखायला लागले. त्यानंतर साधरण दुपारी एकच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. गुरमित सिंग असे मृत्यू झालेल्या वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. पंजाब राज्यातील मोहारी या जिल्ह्यातील एका खेडेगावातील ते रहिवाशी होते.
याच कुंडली सीमेवर आतापर्यंत चार जणांचा मृत्यू तर टिकरी सीमेवर सहा जणांचा मृत्यू झाल्याचे आकडे सांगत आहेत.