नवी दिल्ली : काही वर्षांपूर्वी विजयपथावरून सुसाट धावणाऱ्या भाजपच्या रथाची गती आता लक्षणीयरित्या मंदावली आहे. देशातील सर्व राज्यांत मुसंडी मारण्याची आकांक्षा बाळगून असणाऱ्या भाजपला 2018 पासून हादऱ्यांमागून हादरे बसत आहेत. दिल्लीच्या रूपाने त्या पक्षाच्या पदरी आणखी एक पराभव पडला आहे.
मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तिसगढ या तीन राज्यांत 2018 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या.
त्या तिन्ही राज्यांत कॉंग्रेसने भाजपला पराभूत केले. त्यामुळे देश कॉंग्रेसमुक्त करण्याच्या भाजपच्या संकल्पाला मोठा तडा गेला. त्यानंतर मोठ्या राजकीय उलथापालथींमुळे महाराष्ट्राच्या सत्तेने भाजपला हुलकावणी दिली. त्यापाठोपाठ झारखंडची सत्ताही भाजपला गमवावी लागली. मागील काही काळात हरियाणा आणि कर्नाटकची मिळालेली सत्ता काही प्रमाणात भाजपला दिलासा देऊन गेली.
अर्थात, हरियाणात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्षाशी युती करावी लागली. तर कॉंग्रेस आणि जेडीएसमधील बंडखोरीमुळे भाजपला कर्नाटकात सरकार स्थापणे शक्य झाले. मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दिल्ली, हरियाणा आणि झारखंडमध्ये जोरदार कामगिरी केली. मात्र, त्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मतांमध्ये विधानसभा निवडणुकांत मोठी घसरण झाल्याचे दिसून आले.