लष्कराची मारक क्षमता वाढणार
नवी दिल्ली – पाकिस्तानातील बालाकोटच्या हवाई हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आणखी अत्याधुनिक शस्त्र-अस्त्रांनी सज्ज होणार आहे. भारताचा विश्वासू मित्र असलेल्या रशियाकडून भारत अत्याधुनिक रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे. यासाठी 200 कोटींचा करार करण्यात आला आहे. एमआय-35 या लढाऊ हेलिकॉप्टरवर ही क्षेपणास्त्र लावली जाणार असून त्यामुळे लष्कराची मारक क्षमता वाढणार आहे.
भारताच्या लष्कराच्या शस्त्रपुरवढ्यात सर्वात जास्त खरेदी ही रशियाकडून केली जाते. आपल्या खेरदीपैकी 70 टक्क्यांच्या आसपास खरेदी ही रशियाकडून केली जाते. तर रशियाही भारताला शस्त्र विक्रीसाठी तत्पर असतो. याच टप्प्याचा भाग म्हणून ही खरेदी केली जाणार आहे. अचूक निशाणा आणि अजस्त्र क्षमता या नव्या क्षेपणास्त्रांची असणार आहे.
कमी उंचीवरून मारा पण शत्रूच्या टप्प्यात येणार नाही, असे या हेलिकॉप्टरचे वैशिष्ट आहे. त्याच्यावर ही नवी यंत्रणा लावल्यास या हेलिकॉप्टरची मारक क्षमता कितीतरी पटीने वाढणार आहे. ही खरेदी तातडीच्या खरेदीअंतर्गत केली जाणार आहे. लष्कराच्या मागणी विभागाने काही दिवसांपूर्वीच संरक्षणंत्री राजनाथसिंग यांच्यापुढे या क्षेपणास्त्राचे सादरीकरण केले होते. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला गेला.
अमेरिकेकडूनही शस्त्रास्त्र खरेदी
देशाच्या सुरक्षेला आता सरकार प्राधान्य देत आहे. त्या दृष्टीने भारताने आता महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. भारत सरकार अमेरिकेकडून तब्बल 10 बिलियन अमेरिकी डॉलरची शस्त्र खरेदी करणार आहे. अमिरेकेसोबत खरेदी व्यवहार पूर्ण करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दौरा देखील करणार आहेत. यासाठी डीएसीची देखील स्थापना करण्यात आली आहे. डीएसीच्या अध्यक्षपदी राजनाथ सिंह असणार आहेत. दरम्यान, डीएसीने कामाला सुरूवात केली असल्याची माहिती देखील समोर येत आहे.