नवी दिल्ली – पश्चिम बंगालमधील प्रचारात सहभागी झाल्याबद्दल बांगलादेशच्या आणखी एका अभिनेत्याला भारत सोडून जाण्याचा आदेश देण्यात आला आहे. गाझी अब्दुल नूर असे त्या अभिनेत्याचे नाव आहे. व्हिसाची मुदत संपल्यानंतरही तो भारतात राहिल्याचे उघड झाले आहे. तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या एका उमेदवाराच्या प्रचारात नूर सहभागी झाल्याची माहिती पुढे आल्यानंतर तो रडारवर आला.
व्हिसा नियमांचा भंग केल्याबद्दलही त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे समजते. याआधी फिरदोस अहमद या बांगलादेशी अभिनेत्याला भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आली होती. तोही तृणमूलच्याच उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झाला होता. बिझिनेस व्हिसाच्या आधारे तो भारतात आला होता. मात्र, प्रचारात सहभागी झाल्याने त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला.